बेलपिंपळगाव परिसरात कांदा लागवड जोमात
बेलपिंपळगाव – यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढली आहे.त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे सावट कुठेही दिसत नाही. याचा परिणाम असा की शेतकरी मोठ्या प्रमाणात सुखावला आहे. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगावसह तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग कांदा लागवडीकडे वळला आहे. मात्र एकावेळी अनेकांनी कांदा लागवड सुरू केल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. लागवडीसाठी मजूर मिळेत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी कांद्याचे भाव वाढल्याने सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात कांदा लागवड करायला सुरूवात केली. गहू, हरभरा, ऊस या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्या असल्याचे चित्र आहे.सर्वत्र कांदा पीक घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या कांद्याच्या रोपाचे देखील भाव वाढले आहेत. कांदा लागवड करण्यासाठी गावोगावी मजूर देखील सज्ज झाले आहे. ज्या प्रमाणे कांद्याचे भाव वाढले तसेच कांदा लागवड करणाऱ्या मजुरांचे देखील भाव वाढले आहेत. सर्वच ठिकाणी या पिकांची लागवड केली जात असल्याने कांदा लागवडीसाठी मजूर देखील लवकर मिळत नाही. त्यांची मोत्यामोत्या करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे.
काही मजुरांना तर शेतात येण्याजाण्यासाठी शेत मालकाकडून वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शेतकरी इतकी मरमर करतोय पण येणाऱ्या काळात कांदा पिकाला भाव मिळाला पाहिजे. ही मात्र मोठी आशा आहे. योग्य हमीभाव मिळेल की नाही हे कोडं पडलं आहे. कांदा हा नेहमी रडवत असतो. कधी शेतकऱ्याला तर कधी विकत घेणाऱ्याला पण या वेळी नक्की कांदा रडवेल हे मात्र गुलदस्त्यात आहे.