कोपरगाव -आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोपरगावचा चेहरामोहरा बदलणार आहे. तुम्ही विविध विकास कामांचे प्रस्ताव पाठवा ते प्रस्ताव मंजुर करुन कामे पूर्ण करुन देतो, हा माझा शब्द आहे, असे अभिवचन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव येथील दिला.
शहरातील नवीन बसस्थानक, शहर पोलीस ठाण्याची इमारत व पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा तसेच पंचायत समिती परिसरात उभारलेल्या कर्मवीर स्व. खासदार शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी मंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार किशोर दराडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अनुराधा आदिक,चंद्रशेखर घुले, पुष्पाताई काळे, चैताली काळे, स्नेहल शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, सिताराम गायकर, राजेंद्र फाळके, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थिती होते.
मंत्री पवार म्हणाले की, विकासात राजकारण करणार नाही. आशुतोष काळे यांना कसेबसे निवडून दिले. आम्ही लाखात निवडून येतो. पुढच्यावेळेस मताधिक्य वाढले पाहिजे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मताधिक्य वाढले पाहिजे. घोडा मैदान कुठे लांब आहे ते बघतो. मी सांगितलेले कामे नाही केले तर मी पवारांची आवलाद नाही, पण तुम्ही आगामी निवडणुकात राष्ट्रवादीच्या उमेदवांराचे मताधिक्य वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पवार यांनी आशुतोष काळे यांच्या कार्याचे कौतूक करुन त्यांनी सुचवलेले सर्व कामे मार्गी लावणार तसेच कोपरगाव शहर डासमुक्त व पाणीदार करणार असल्याचे सांगताना काळे यांनी गोदावरी व निळवंडे कालव्याच्या कामांना गती देण्याबरोबर योग्य निधीची मागणी केली. ती पुर्तता करणार असल्याचे सांगत मंत्री पवार म्हणाले, जनसेवेसाठी स्व. काळे यांनी आयुष्य खर्च केले. त्यामुळे त्यांचा पुतळा उभा आहे. याचा मला अभिमान आहे. राज ठाकरे यांना भोंग्यांचा आताच का त्रास होतोय. केवळ जातीपातीचे राजकारण न करता एकमेकांबरोबर सलोख्याने राहीले पाहीजेत.समाजात दरी निर्माण करण्याचे काम सुरू आहे, अशी टिका त्यांनी केली.
मुश्रीफ म्हणाले, आर्थिक अडचणी असताना मोठा निधी तालुक्याला आ. काळे यांच्यामुळे मिळाला. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आ. काळे यांच्या प्रयत्नातून विविध विकासासाठी निधी देण्यात येत आहे. आ. काळे यांच्या पाठीमागे मी हिमालयासारखा उभा राहणार आहे.
वळसे पाटील म्हणाले की, आ. काळे यांनी आजोबा व वडिलांचा वारसा जपला आहे. आ. काळे यांनी सकाळपासून अजित पवार यांची गाडी चालवता चालवता अनेक विकास कामांची मागणी करीत होते तर अजित पवार तितकाच लाड काळे यांचा करत होते, असे म्हणत काळे यांच्या विकासकामाची धडपड वळसे पाटलांनी आपल्या शैलीत सांगितली.
आ. आशुतोष काळे म्हणाले, शरद पवार व अजित पवार यांच्यामुळे शहराचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी मोठा निधी मिळाला. संगमनेरच्या धरतीवर कोपरगावचे बसस्थानक होणे अपेक्षित होते पण नियोजनाचा अभाव झाला. यापुढे विकास कामांना अधिक गती देणार असून अडीच वर्षात 165 कोटीचे रस्त्यांची कामे सुरु आहेत.तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कालव्याचे नुतनीकरण होणे आवश्यक आहे. पाटपाण्याच्या इतर जाचक अटीतून मुक्तता करावी. निळवंडे कालव्याचे कामे पूर्ण झाले पाहिजे, असे ते म्हणाले. तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. स्नेहल शिंदे यांनी आभार मानले.
ठाणे व वसाहतीसाठी 24 कोटी
तालुका पोलीस ठाण्याची इमारत व पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था आ. काळे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने या दोन्ही कामांसाठी 24 कोटीचा निधी देणार असल्याचे मंत्री पवार यांनी जाहीर केले.
शंकरराव काळे यांचे नाव अग्रभागी
नगर जिल्ह्याच्या विकासाचा इतिहास लिहिला तर त्यात स्व. शंकराव काळे यांचे नाव अग्रभागी असणार आहे. तसेच माजीमंत्री शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात, गडाख, घुले, तनपुरे यांचीही नावे असतील.
==========================