सत्र न्यायालयात शरण जाऊन रितसर जामीन घेण्याचे निर्देश
नवी दिल्ली –भाजप आमदार जयकुमार गोरे यांना आज सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. गोरे यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका न्यायालयाने बुधवारी फेटाळली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.
याप्रकरणी आपण कोणतीही फसवणूक केलेली नसल्याचा दावा गोरेंच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.
तर सरकारी वकिलांच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गोरेंची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सत्र न्यायालयात शरण जाऊत रितसर जामीन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
वडूज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मात्र कुठेच दिलासा न मिळाल्याने जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव भिसे यांनी पोलिसांत फौजदारी तक्रार दिली आहे.