मुंबई – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही नैसर्गिक युती असल्याचे म्हंटले होते.आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांना पाठींबा दर्शवला आहे. त्यानंतर, ठाकरे यांनी जी भूमिका आता घेतली आहे तीच अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर आमच्यावर आज जी वेळ आली आहे ती आली नसती असं सूचक विधान शिंदे यांनी केलं आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेनी ठाण्यातील आनंदाश्रमात हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी विविध गोष्टीबाबत भाष्य केलं. आम्हाला आता कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नसून राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही शिंदेनी यावेळी स्पष्ट केले. गुरुपौर्णिमीचे औचित्य साधत यावेळी शिंदेनी आनंद दिघेंसह बाळासाहेब ठाकरेंना देखील वंदन केलं.
या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी, सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार असल्याचे देखील शिंदेनी यावेळी सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणारी भेट ही सदिच्छा भेट असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले. आम्ही घेतलेली भूमिका ही हिंदुत्वाची भूमिका असल्यामुळे राज्यातून आम्हाला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील शिंदेनी यावेळी स्पष्ट केले.