मुंबई : आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप देण्यात येणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटले जाते. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. या दिवशी अनेक जण उपवासही करतात.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा नामगजरात आज बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. साश्रू नयनांनी गणेशभक्त बाप्पाचे विसर्जन करतील.
मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचे आज विसर्जन होईल. मुंबई, पुण्यासह राज्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळेल. दोन वर्षानंतर करोनाचे विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.