मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. राज्य हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल हा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
यासोबतच धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णयही राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलो. त्यासाठी 1 हजार कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली असून, या निर्णयाचा 5 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पीएम श्री योजना राज्यात लागू करण्याचाही महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत ही योजना राबवली जाणार आहे. या येजनेअंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ, ग्रंथालय अशा सोयी सुविधा अद्यावत करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, साक्षरतेचा दर वाढवणे, यासाठी उपाय योजना सुचवल्या जातील.
तुळापूर, वढू बुद्रुकसाठी 397 कोटी
पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी 397 कोटी 54 लाख खर्चाचा विकास आराखडा, जेजुरीसाठी 127 कोटी 27 लाखाचा विकास आराखडा व सेवाग्राम विकासासाठी 162 कोटींचा विकास आराखडा बैठकीत मंजूर करण्यात आला.
बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय
– डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
– महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत. (सार्वजनिक आरोग्य विभाग)
– पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे 787 कोटी खर्चास मान्यता. 7690 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. (जलसंपदा विभाग)