श्रीनगर – जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर बंद करण्यात आलेले महाविद्यालय बुधवारी 66 दिवसानंतर खुले करण्यात आले. मात्र, बहुतांश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हजेरी न लावल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे सर्वत्र चित्र होते. काश्मिर खोऱ्यात तणाव निर्माण झाल्याने सर्व महाविद्यालये 5 ऑगस्टपासून बंद करण्यात आले होते.
काश्मिरचे विभागीय आयुक्त बसीर खान यांनी गतआठवड्यात राज्यातील शाळा 3 ऑक्टोंबर, तर महाविद्यालय 9 ऑक्टोबरला पुन्हा सुरु होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी महाविद्यालय उघडण्यात आली. परंतु राज्यातील तणाव आणि हिंसाचारामुळे बंद असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून त्यांनी पाल्यांना शाळा आणि महाविद्यालयात पाठविण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, कलम 370 रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्यात आंदोलन सुरू असल्याने अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी सकाळी 11 वाजेपर्यतच बाजारपेठ खुली असते.