राहुरी विद्यापीठ: राहुरी शहर हद्दीतील जोगेश्वरी आखाडा येथील वैष्णवी रविंद्र कातोरे (वय 17) या कॉलेज तरूणीने शनिवारी (दि.1) सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेजारीच राहणाऱ्या एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वैष्णवी 12 वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. एक जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वैष्णवी हिने आपल्या राहत्या घरात असलेल्या फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला आणि आपली जिवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वैष्णवी हिचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. नंतर शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
वैष्णवी हिला तीच्याच कॉलेजमध्ये शिकणारा आणि तीच्या घरा शेजारीच राहणारा एक मुलगा त्रास देत होता. घटनेच्या एक दिवस अगोदर सदर मुलगा व वैष्णवी हिच्या नातेवाईकांमध्ये काहीतरी कुजबूज झाली होती. त्या मुलाने व्हॉट्सऍपच्या माध्यमातून वैष्णवी हिची बदनामी केली होती. त्याच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. एस. कारेगावकर हे करीत आहेत.