कुपवाडा – काश्मिरमधील कुपवाडा (kupwada) येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrpati shivaji maharaj) अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला.
आम्ही पुणेकर संस्था, 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन (Maratha batalian) यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj statue) पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.
छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrpati Shivaji maharaj) वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात “जी 20′ परिषद झाली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही रात्रं दिवस सीमेवर प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यामुळे आम्ही सर्व सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.