दौंड-जगभरात थैमान घातलेल्या करोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक या व्हायरसचे शिकार झाले आहेत. भारत देशात करोना प्रसार रोखण्यासाठी रविवारी “जनता कर्फ्यू’ला दौंड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. तालुक्यात रविवारी सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत होता.
नागरिकांनी आपली दैनंदिन कामे सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवर वाहने नसल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. नेहमी लोकांच्या गर्दीने गजबजलेली ठिकाणे, हॉटेल, चौक अशी ठिकाणे ओस पडली होती. आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते. दौंड नगरपालिकेच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सर्व रस्ते व दौंडमधील जुन्या गावठाणातील भागात जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. उर्वरित भागातही फवारणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी यावेळी सांगितले.