टाकीत अडीच किलो गॅस कमी ः ग्राहकांची राजरोस लूट
केंदूर-करंदी (ता. शिरूर) येथील ग्राहकांच्या सतर्कतेमुळे गॅस वितरकाचा काळा बाजार उघडकीस आला आहे. गॅस सिलेंडरमधून तब्बल अडीच किलो गॅस कमी येत असल्याने वितरक ग्राहकांची लूट करत असल्याचे समोर आले आहे.
पाबळ (ता. शिरूर) येथील मे. शामा भारत गॅस ग्रामीण वितरकाची गाडी गॅस वितरणासाठी करंदी गावात येत असते. अनेकवेळा ग्राहकांनी गॅसच्या टाकीमध्ये गॅस कमी येत आहे, शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अतिरिक्त पैसे वसूल करत असल्याचे त्याचबरोबर कोणतीही पावती देत नसल्याची तक्रार या वितरकाची तक्रार केली होती; मात्र वितरकावर कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत होते. त्याच पार्श्वभूमीवर काही ग्राहकांची लूट होत असल्याची बाब माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्ष ढोकले यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर प्रत्येक ग्राहकाने खरेदी केलेल्या गॅसच्या टाकीचे वजन केले असता. प्रत्येक टाकीमध्ये तब्बल एक ते अडीच किलो गॅस कमी असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत महसूल प्रशासनाला तक्रार केली असता महसूल प्रशासनाचे अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्याने अखेर शिक्रापूर पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता तात्काळ पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी धाव घेतली. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या आवारात शिरूर वैधमापनशास्त्रचे निरीक्षक द. प्र. उपरे यांनी या घटनेचा पंचनामा केला व मे. शामा गॅस वितरक गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या वितरकाच्या गाडीत वजनकाटा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान प्रत्येक ग्राहकाकडून तब्बल 34 रुपये जादा आकारले जात असून देखील याची कोणतीही रीतसर पावती ग्राहकांना दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ यावेळी संतप्त झालेले पाहायला मिळाले.
- आंदोलन छेडण्याचा इशारा
करंदी गावामध्ये रोज किमान 30 टाक्या वितरित केल्या जातात. प्रत्येक टाकीमध्ये सरासरी किमान दोन किलो गॅस चोरी केल्याने किमान एकट्या करंदी गावातच रोजची तीन ते चार हजार रुपयांची लूट केली जात आहे. त्यामुळे या एका गावचीच वर्षाला तब्बल दहा ते बारा लाख रुपयांची लूट होत असल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. याबाबत किरण ढोकले, विकास दरेकर, कैलास नप्ते, शिवाजी दरेकर, नृसिंह ढोकले यांनी या वितरकाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिरूर बाजार समितीचे संचालक शंकर जांभळकर यांनी या वितरकावर योग्य ती कारवाई होत नसल्यास परिसरातील गावातील ग्राहकांना सोबत घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रभातशी बोलताना दिला आहे. - राजकीय नेते लुटारुंच्या पाठीशी
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना एका पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष या वितरकाच्या बचावासाठी अधिकाऱ्यांना विनवणी करण्यासाठी पंचनामास्थळी हजार झाले होते. त्यामुळे अशा वितरकांना राजकीय मंडळी पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. सामान्य नागरिकांची लूट करणाऱ्यांच्या विरोधात सामान्यांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी अशा प्रकारे राजकीय मंडळी लुटारूंना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे सामान्यांनी कोणाकडे मदत मागायची असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.