कोपरगाव -अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ड्रेनेजची व्यवस्था आदींसह तालुक्यातील पाणी, शेती, रस्ते आणि इतर प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावेत, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री शिंदे शिर्डी दौऱ्यावर आले असता कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लताताई शिंदे, महसूलमंत्री तथा राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
यंदा अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडले असताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीचे नियम-निकष बदलले आणि नुकसानग्रस्तांना ताबडतोब नुकसानभरपाई दिल्याबद्दल कोल्हे यांनी सरकारचे अभिनंदन केले. पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत तालुक्यातील सुमारे 13 हजार शेतकऱ्यांनी यावर्षी वेगवेगळ्या पिकांचा विमा उतरवून हप्ते भरले. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी 57 कोटी रुपये मिळायला हवे होते; परंतु विमा कंपन्यांकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. कंपन्यांनी अत्यंत अल्प प्रमाणात नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अनेक शेतकरी अजूनही पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्तांना 100 टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली.
कोल्हे म्हणाल्या की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकमठाणवासीयांच्या अडचणीत भर पडली असून, शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. कोकमठाणच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी या कामात दबली गेली आहे. ती अन्यत्र हलवून हे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर कोकमठाणवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. ही प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी खडी व इतर साहित्याची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांमुळे तालुक्यातील अनेक रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, हे सर्व रस्ते समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाने अगर ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशीही मागणी कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी हे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्याची ग्वाही कोल्हे यांना दिली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन दिले.