यशेंद्र क्षीरसागर
अभिनयाच्या आकाशातील तळपता सूर्य म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन! त्यांचा वाढदिवस नुकताच आपण जल्लोषात साजरा केला. पद्मविभूषण अमिताभ यांचा वाढदिवस “11 ऑक्टोबर’ हा चित्रपटेप्रेमींसाठी आणि खास करून अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी उत्सवाप्रमाणे असतो. वैयक्तिक जीवनातील प्रचंड वादळ, कष्ट, जीवनातील प्रचंड चढ- उतार, अपमान, अवहेलना असे सर्व सहन करीत “अमिताभ बच्चन’ नावाचे सात अक्षरांचे वादळ गेली 54 वर्षे चंदेरी दुनियेत अढळ स्थानावर आहे.!
अमिताभ बच्चन नावाचा ऊर्जेचा महासागर, “आदर, आभार, अभिनंदन” म्हणीत पुन्हा एकदा “कौन बनेगा करोडपती’मधून आपल्या भेटीस आला आणि पुनश्च चैतन्याचे चांदणे पसरले. “फक्त 81′ वय असलेला हा ‘तरुण’ महानायक 82 व्या वर्षात पदार्पण करतोय. “शोले, दीवार, अमर अकबर अँनंथनी, मुकद्दर का सिकंदर, शराबी या चित्रपटापासून ते “अग्निपथ, ब्लॅक, पा, पिकू, पिंक’ अशा प्रयोगशील नव्या दमाच्या चित्रपटांतून देखील अभिनयाचे इंद्रधनुष्य सप्तरंग चंदेरी पडद्यावर अमिताभ बच्चन यांनी बिखरले. सुरवातीच काळात मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा अशा व्यावसायिक दिग्दर्शकांनी अमिताभला साथ दिली. त्यासोबतच नव्वदच्या दशकानंतर संजय लीला भन्साळी, शुजीत सरकार, आर. बाल्की, अनिरुद्ध चौधरी अशा नव्या दिग्दर्शकांनीही अमिताभ यांच्यासाठी नवनवीन संधी दिली. “चिनी कम”हा वेगळ्या कथेवर असा धाडसी, प्रयोगशील चित्रपट पाहिला तरी समजते की, त्याचा अभिनय अथांग आहे! अमिताभच्या चित्रपटांचा आशय इतका विस्तृत आहे की, त्यांच्या चित्रपटातील सामाजिक आशय या विषयावरसुद्धा पीएच. डी. करणारे आहेत! कुली चित्रपटाच्या वेळी अपघात झाला, तेव्हा संपूर्ण देशात अमिताभविषयी प्रेमाचा महासागर उसळला. अक्षरश: लोकांनी उपवास केले. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या. शराबी हा चित्रपट तर आयुष्यभर लक्षात राहील असा आहे. व्यावसायिक असून सुद्धा आणि स्वतः मदिरा प्राशन करत नसताना अमिताभ यांनी या चित्रपटाला एक वेगळीच कलात्मक उंची प्राप्त करून दिली
. “आखरी रास्ता’ चित्रपटातही डबल रोल सहज साकारत असताना म्हाताऱ्या डेव्हिडची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. हा डेव्हिड अन्याय करत असणाऱ्या सर्व खलनायकांना युक्तीने मारून टाकतो. त्याच्यावर झालेल्या अन्यायात व नंतर घेतलेल्या बदल्यामध्ये प्रेक्षक कधी समरस झाले, हे समजत सुद्धा नाही. सिलसिला, सौदागरसारख्या गंभीर भूमिकाही त्यांनी अत्यंत सहज सुंदर केल्या. हेमामालिनी सोबत ‘बागबान’ हा चित्रपट तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या ह्रुदयात घर करून आहे. अत्यंत नम्र स्वभाव, सभ्य भाषा आणि आपण निवडलेल्या कार्यक्षेत्रावर मनापासून प्रेम या गुणांच्या आधारे अमिताभ शतकातील सुपरस्टार ठरले. कार्यशील राहण्यासाठी वयाचे, परिस्थितीचे बंधन नसते आणि नसावे. अनेक वेळा, “आमचे आता झाले गेले’ असे म्हणणारे अनेक जीव आपल्या आसपास आढळतात! खरे तर अनुभवी व्यक्तींनी आपले अनुभव आणि ज्ञान तरुण पिढीला देण्यासाठी कायम पुढे सरसावले पाहिजे. सतत चैतन्यशील राहिले पाहिजे. त्यातून इतरांना फायदा होईल आणि स्वतःलाही आनंदाचा नवा स्रोत गवसेल.
अनेक कलाकार आणि राजकीय व्यक्तिमत्वे पंच्याहत्तरीच्या पुढे देखील उत्साहाचे जणू बहरलेले वृक्ष आहेत! महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत खऱ्या अर्थाने 1920 मध्ये सुरुवात केली, तेव्हा त्यांचे वय 51 होते. वयाच्या कोणत्या टप्प्यात सुरुवात करावी याबाबत काहीच आडाखे अजिबात बाळगू नयेत. “कौन बनेगा करोडपती’ हा प्रश्नोत्तरांचा शो बघण्याचा मित्रांसोबत अत्यंत दुर्मिळ सुवर्णयोग आला. त्यावेळी अमिताभजींच्या अंगातील ऊर्जा प्रत्यक्ष पाहायला मिळाली. एक ते दीड तासाच्या फायनल एपिसोडसाठी सलग चार ते पाच तास सेटवर असूनही आणि सातत्याने कार्यशील राहायला लागत असूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा अथवा तक्रार जाणवत नव्हती. अत्यंत हसत खेळत आणि समाजशील वृत्तीने ते संपूर्ण सेटवर प्रेक्षकांशी आणि प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या स्पर्धकांशी दिलखुलास संवाद साधत होते. हलकेसे विनोद करत होते. कोणत्याही प्रकारची चिडचिड त्यांच्या वागण्यात जाणवत नव्हती. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि पंधरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून अब्जाधीश झालेले, खूप महत्त्वाचा भारतातील ‘पद्मविभूषण’ हा नागरी सन्मान प्राप्त झालेले अमिताभ यांना तशा अर्थाने कामकाजाची काहीच आवश्यकता नाही.
परंतु, त्यांना “जीवन म्हणजे काय” ते समजले आहे. वयाची 81 वर्षे कधीच उलटलेले महान शायर गुलजार अजूनही सकाळी 10 वाजता त्यांच्या कार्यालयात लेखन कामासाठी हजर असतात! अशा सतत कार्यसंपन्न जीवनशैलीमुळे वैयक्तिक दुःखे कुठल्या कुठे पळून जातात. म्हणूनच वयाची ऐंशीवर्षे उलटूनसुद्धा अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पाचवे नॅशनल अवार्ड मिळाले, तर आश्चर्य वाटणार नाही. 1969 मधईल “सात हिंदुस्तानी’पासून सुरू झालेला हा प्रवास अगदी 2023 च्या टायगर श्रॉफ अभिनित “गणपत’ या नव्या चित्रपटापर्यंत अव्याहत चालू आहे. तो अखंड चालूच राहील. खरे आहे ना मित्रांनो?