मनस्वी अभिनेत्री स्मिता पाटील यांची जयंती याच महिन्यात साजरी होत आहे. 17 ऑक्टोबर 1955 रोजी त्यांचा पुण्यात जन्म झाला. बोलके डोळे, सावळा शिडशिडीत देह, तरुणपणीच चेहऱ्यावर आलेली परिपक्वता आणि त्या जोडीला अभिनयाची उत्कृष्ट जाण या सोनेरी संगमामुळे स्मिता पाटील या मराठमोळ्या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीवर अजरामर छाप सोडली. वडील राजकारणी आणि आई समाजसेविका असलेल्या दाम्पत्याच्या पोटी जन्म झालेल्या स्मिताला श्याम बेनेगल यांना पद्मविभूषण प्राप्त दिग्दर्शकांची साथ लाभली. चरणदास चोर या चित्रपटातून स्मिताचे आगमन झाले. त्यावेळी तिचे वय वीस वर्षे सुद्धा नव्हते.
या मुलीमध्ये प्रचंड अभिनयक्षमता आहे आणि कमी वयात आलेली सामाजिक दृष्टी आणि परिपक्वता हे श्याम बेनेगल या दर्जेदार भारतीय दिग्दर्शकांनी ओळखले आणि त्यानंतर एक अदभूत अभिनेत्रीचा अजरामर प्रवास सुरू झाला. शाम बेनेगल यांच्याबरोबरच गोविंद निहलानी यांच्यासारखे दिग्दर्शकही स्मिताला लाभले. त्यामुळे तिचा अभिनय अधिकच निखरत गेला. “मंथन’मधून गिरीश कर्नाडबरोबर स्मिता अत्यंत आत्मविश्वासाने उभी राहिली.
अभ्यासू आणि दर्जेदार दिग्दर्शकांनी ओळखले होते की स्मितामध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे आणि वयाच्या पंचविशीत तरुणांमध्ये अभावानेच आढळणारी अद्वितीय प्रगल्भता आहे. त्यातूनच मंथन, आक्रोश, चक्र, भूमिका, मिर्च मसाला, चिदंबरम असे चित्रपट एकापाठोपाठ एक आकार घेत गेले. 1975 ते 1985 अशा केवळ दहा वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत स्मिता पाटील यांनी अत्यंत अर्थपूर्ण भूमिका जगल्या. कुलभूषण खरवंदा, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, गिरीश कर्नाड अशा रंगभूमीवरच्या सशक्त कलाकारांबरोबर स्मिताने लीलया अभिनय केला. केवळ अभिनय केला असे नव्हे तर ती प्रचंड आत्मविश्वासाने या महान कलाकारांसोबत वावरली. कुठेही नवखेपणा न जाणवता तिने आपल्या भूमिका साकारल्या. श्याम बेनेगल दिग्दर्शित “भूमिका’ चित्रपटासाठी 1977 मध्ये वयाच्या केवळ 22 व्या वर्षी स्मिताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. या चित्रपटात तिने अभिनेत्रीची चढउतार युक्त वाटचाल अत्यंत सशक्तपणे उभी केली. ही भूमिका अनेकरंगी होती.
प्रत्यक्ष चित्रपट कलाकाराची ही भूमिका होती. वयाच्या केवळ 22 व्या वर्षी एका तरुण मुलीच्या आईची तसेच अनेक पुरुषांचे विचित्र अनुभव आलेल्या स्त्रीची भूमिका साकारणे प्रचंड आव्हानात्मक काम होते. या भूमिकेत खूप ताणतणाव- ताणेबाणे आणि वाटावळणे आहेत…म्हणूनच या अवघड भूमिकेसाठी स्मिताला वयाच्या पंचविशीच्या आतच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गौरविण्यात आले. आणि त्यानंतर 1981 मध्ये “चक्र” चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्मिता पाटील यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरव झाला.
“आक्रोश’चित्रपटातूनही ओम पुरी आणि नसरुद्दीन शहा यांच्याबरोबर तिने खूप सुंदर भूमिका साकारली. आक्रोश या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद निहलानी होते. 1975 च्या आसपासच्या काही वर्षातच स्मिताने उंबरठा, सामना आणि जैत रे जैत असे अत्यंत दर्जेदार वेगळ्या धाटणीचे आणि आशयघन मराठी चित्रपट केले. असे चित्रपट आणि त्यातील भूमिका साकारणे तरुण वयातील मुलीला अत्यंत आव्हानात्मक आणि अवघड होते. “मी रात टाकली, मी कात टाकली’ म्हणत जंगलात फिरणाऱ्या आदिवासी तरुणीची “जैत रे जैत’मधील भूमिका कोणीच विसरू शकणार नाही. तर “उंबरठा’मधील प्रगल्भ स्त्रीची भूमिका अजरामर झाली. समांतर म्हणजेच कलात्मक चित्रपटातून रमलेल्या स्मिताला दर्जेदार आणि जीवनाच्या जवळ जाणाऱ्या वास्तव भूमिकांचे जणू वेडच लागले होते.
तिला समाज समजला होता, तिला माणसे समजली होती, तिला मानवी संबंधांमधील ताणतणाव समजले होते. या सर्वच वैशिष्ट्यांची जाणीव तिची प्रत्येक भूमिका पाहताना होते. महत्त्वाची गोष्ट अशी की दर्जेदार पुरुष कलावंतांसमोर ही तरुण मुलगी बुजली नाही. लाजली नाही.कुलभूषण खरवंदांसारख्या कलाकाराबरोबरसुद्धा आत्मविश्वासाने तिने “अर्थ” चित्रपटात कसदार भूमिका साकारली. शबाना आझमीसारख्या ताकदीच्या कलाकार मैत्रिणीसोबत तिने भूमिका केल्या.
ज्या वयात तरुणींना अल्लडपणा, लग्नाची स्वप्ने पडतात आणि केवळ मौजमजा याखेरीज आयुष्याचा अर्थ समजत नाही, त्या तरुण वयात म्हणजे वयाच्या वीस वर्षापासून ते 1986 ला निधन होईपर्यंत म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षापासून वयाच्या एकतिसाव्या वर्षापर्यंत स्मितामध्ये एक अद्वितीय, अद्भुत अशी प्रगल्भता विराजमान होती. समांतर चित्रपट करत असतानाच “नमकहलाल’ आणि ‘शक्ती’ सारखे व्यावसायिक चित्रपटही तिने केले. “नमकहलाल’मध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ती सहज रमली तर शक्तीमध्ये बापाच्या आणि मुलाच्या ताणतणावयुक्त संबंधांमध्ये तणावात असलेली रोमा तिने अत्यंत सहजपणे साकारली.
शक्ती चित्रपटाच्या वेळी तिचे वय जेमतेम 26 ते 27 होते. महत्त्वाचे असे की भारतातील दोन सुपरस्टार दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन तसेच दर्जेदार अभिनेत्री राखी यांच्यासोबत पडद्यावर वावरणे आणि तेही एखाद्या गंभीर भूमिकेत वावरण, हे निश्चितच सोपे नव्हते. परंतु, ही भूमिका तिने अत्यंत सुंदरपणे रेखाटली. 1980च्या आसपासच अमृत, कसम पैदा करने वाले की असे चित्रपट येत राहिले. “अमृत’मधून राजेश खन्नाबरोबर तिने अत्यंत प्रगल्भ विशेष म्हणजे वृद्ध स्त्रीची भूमिका साकारली.
वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आणि तणाव तिने सोसले भोगले. राज बब्बर यांच्याशी झालेल्या विवाहानंतरही खूप टीकाटिपणी तिला सहन करावी लागली. परंतु, मुळातच सहनशील स्मिताने हे वादळ पचवले. केवळ 31 व्या वर्षी स्मिता देवाघरी गेली. दहा वर्षांच्या कारकिर्दीत तिने 100 हून अधिक चित्रपट केले. दर्जा आणि भूमिका समजून घेण्याची ताकद या सर्व कसोटीवर स्मिता 100 टक्के उत्तीर्ण नव्हे तर विशेष योग्यतेसह पास झाली. वयाच्या केवळ एकोणतिसाव्या वर्षी तिला भारत सरकारचा पद्मश्री सन्मान प्राप्त झाला. आज स्मिता असती तर… तिने शेकडो सशक्त भूमिका साकारल्या असत्या. त्यामुळे “स्मिता, आज तू हवी होतीस…’ अशी भावना दाटून येते. आणि मनाला हुरहूर लागते.