ज्ञानदेव शेलार
नगर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर आता चांगलाच वाढत आहे. प्रचारावेळी प्रत्येक विद्यमान लोकप्रतिनिधी व माजी लोकप्रतिनिधी मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला असे सांगत असतो. मात्र हा कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी खर्च होऊनही मतदारसंघातील गावागावांत स्वच्छ पाणी, रस्ते, स्वच्छता व शासनाच्या विविध योजनांपासून वंचित व्यक्ती अद्यापही का दिसतात, असा प्रश्नच आता खुद्द मतदारांना पडला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या कामांचा दावा अन् मला गावात विकास दावा,अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
माघारीमुळे स्पष्ट निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढती रंगणार आहेत. त्यात काही ठिकाणी पारंपरिक विरोधक एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत, तर काही ठिकाणी नव्या समोर जुना व जुन्यासमोर नवा उमेदवार आपली ताकद आजमावत आहेत. या उमेदवारांकडे आता उणेपुरे अकरा दिवस प्रचारासाठी राहिले आहेत. त्यामुळे पायाला भिंगरी लावून हे उमेदवार प्रचार करत आहेत. प्रचारात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत.
आपण मतदारसंघात एकके कोटी रुपये आणले आहेत. त्यातून ही कामे झाली आहेत, इतकी कामे मंजूर आहेत, तसेच आगामी काळात या कामांना मी भरघोस निधी मिळवून देणार आहे, असे सत्ताधारी उमेदवार सांगत आहेत. तर माजी लोकप्रतिनिधी आपण मंजूर करून आणलेल्या कामांचे विद्यमान लोकप्रतिनिधी श्रेय घेत आहेत. आपणच या कामासाठी निधी आणला आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे जनताही संभ्रमात आहे की निधी नेमका आणला कोणी, काम सुरू झाले कधी व पूर्ण झाले कधी व आपल्याला ते दिसत कसे नाही. मात्र या उमेदवारांचे दावे-प्रतिदावे ऐकूणच त्यांना सध्या करमणूक करून घ्यावी लागत आहेत.
विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी जर खरेच मतदारसंघासाठी पाच वर्षांत तीस-तीस, चाळीस-चाळीस कोटी रुपयांचा निधी आणत असतील, तर मतदारसंघाचा पूर्ण कायापालटच होण्याची गरज आहे. मात्र अद्यापही अनेक गावांतील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरलेला नाही. दरवर्षी जानेवारीपासूनच या महिलांना पाण्यासाठी दाही दिशा फिराव्या लागत आहेत. शुद्धतर सोडाच पण साधे पाणीही त्यांना मिळत नाही. तोच प्रकार शेतीच्या पाण्याचाही आहे. रस्त्यांची स्थितीतर भयानक आहे. अनेक गावांना अद्यापही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षाच आहे.
पक्के रस्ते नसल्याने गावात बस येत नाही. पावसाळ्यात तर विद्यार्थी व शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच ज्या गावांत रस्ते झालेत, त्यांची पाच-सहा महिन्यांतच वाट लागलेली आहे. त्यामुळे पहिले पाढे पंचावन्न सुरू आहेत. आरोग्याबाबतही तिच स्थिती आहे. अद्यापही अनेक गावांत कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्याच नाहीत. त्यामुळे नाविलाजाने ग्रामस्थांना रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत आहे. त्यामुळे या गावांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
अनेक वेळा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली असता, कचरा टाकायचा कोठे, असा प्रतिप्रश्नच नागरिकांना केला जातो. अनेकदा हा कचरा जाळला जातो. त्याच्या धुराचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. तसे आरोग्य सुविधाही रामभोरोसेच आहेत. अद्यापही ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे खासगी दवाखान्यांत त्यांना कर्ज काढून उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे जर हे आजी-माजी लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयांची कामे मतदारसंघात करत असल्याचे दावे करत आहेत, तर मग आजही आरोग्य, पाणी, स्वच्छतेचे प्रश्न का सुटलेले नाहीत, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.