खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट
नगर – दिवाळी सुट्टीचा रविवार शेवटचा दिवस आणि क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असल्याने अनेक नगरी प्रवाशांनी गर्दी कमी असेल असा विचार करून तारकपूर बस थानक गाठले. मात्र, या ठिकाणी एकच तोबा गर्दी होती. यामुळे पुण्याला जाणाऱ्या एसटीच्या सर्व प्रकारातील बसेसमध्ये उभे राहण्यासाठी जागा नव्हती. यामुळे अखेर प्रवाशांना गर्दीत उभे राहुन पुण्यापर्यंत प्रवास करण्याची वेळ आली.
दरम्यान, या गर्दीचा फायदा खासगी वाहन चालकांनी घेतांना दिसले. त्यांनी या गर्दीच्या संधीचे सोने करत चढ्या भावाने प्रवाशांकडून भाडे वसूल केले. विशेष म्हणजे पुण्याला जाण्यार्यांची गर्दी एकट्या तारकपूर बसस्थानकांवर नव्हती तर माळीवाडा बसस्थनका बाहेर आणि तिननंबरच्या पुणे बसस्थानकावर ही परिस्थिती सारखीच होती. यावेळी खासगी वाहन चालकांनी कमीत कमी प्रती प्रवासी 400 ते 600 रुपये प्रती प्रवासी भाडे आकरल्याची माहिती याठिकाणी असणार्या प्रवाशांनी दिली.
नगरहुन पुण्याकडे जाण्यासाठी नगरच्या तारकपूर आगारासह औरंगाबाद, बीड, मालेगाव, जाळगाव, येवला याठिकाणाहून स्वतंत्र बसेससह जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून कमी अधिक प्रमाणात बसेस सुरू होत्या. मात्र, पुण्याला जाणार्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने आणि विद्यार्थ्यांसोबत ज्यांना रविवारी अत्यावश्यक आणि पुण्याला जाणे अनिवार्य असणार्यांची संख्या मोठी असल्याने गर्दीत एकदम वाढ झाली होती. शिवाय बाहेरून येणार्या पुण्याला जाणाऱ्या बसेस आधीच फुल येवून येत होत्या.
नगर-पुणे रेल्वे सुरू करा
आधीच पुण्याला जाण्यासाठी रस्ते मार्गे चार तासांहून अधिकचा वेळ लागत आहे. त्यात एसटीची अवस्था अशी असल्याने प्रशासनाने तातडीने पुणे-नगर रेल्वे मार्गाचा विषय मार्गी लावण्याची वेळ आली आहे. यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल, अशी भावना अनेक प्रवाशांनी यावेळी बोलून दाखवली. एसटी महामंडळाने कितीही बसेस वाढवल्यातरी रस्त्या मार्गे पुण्याला जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यासाठी नगर-पुणे रेल्वे मार्ग हाच पर्याय असल्याचे अनेकांचे म्हणणे होते.