नगर – शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. जीवाची काहिली होणारे ऊन पडत असल्याने नागरीक उकाड्याने त्रस्त होत आहेत. वाढते ऊन लग्नसोहळ्यांमध्ये वऱ्हाडींचा घाम काढत आहे. पारा वाढला असून गुरुवारी 41 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. वाढल्याने उन्हामुळे दुपारी शहरातील बाजारपेठेसह रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.
अवकाळी पाऊस व ऊन-सावलीच्या खेळामुळे यंदा उन्हाची तीव्रता जाणवलीच नाही. बुधवारी नगर शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअस होते. आज तर हा पारा 41 अंशावर गेला आहे. दिवसभर चटके देणारे ऊन अंगावर झेलत नागरिकांनी लग्नसोहळ्यांना हजेरी लावली. एप्रिलच्या अखेरीस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. परिणामी गारवा निर्माण झाला होता. तापमान 34 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी नोंदवण्यात आले होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरूवात झाली.
गेल्या तीन दिवसापासून कडक ऊन पडत आहे. मे महिन्यात लग्न सोहळ्यांची मोठ्या प्रमाणावर धूम सुरु आहे. भर उन्हात लग्नसोहळ्यांना हजेरी लावताना ऊन वऱ्हाडींचा घाम फोडत आहे. कडक उन्हामुळे नागरीक त्रस्त होत असले तरी हंगामी व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे. रसवंतीगृह, शीतपेये, मसाले ताक, लिंबू , आईस्क्रीम, कुल्फी, बर्फगोळे आदी विक्रेत्यांच्या दुकानांवरील गर्दी वाढलेली दिसली.
तापमान 42 अंशांपर्यत जाणार
पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. तापमापकातील पारा वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नगरमध्ये आताच 42 अंशांपर्यंत तापमान जाण्याची शक्यता असून आणखी उष्मा वाढल्यास त्याचा नक्कीच शरीरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने, घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ, तसेच देवस्थानांतील गर्दीही तुरळक झाली. त्यातच हवामान विभागाने काहिली वाढण्याची शक्यता वर्तविल्याने घाम फुटला आहे.