शहरात विकास कामांची घौडदौड
कोपरगाव – आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या चार वर्षात कोपरगाव शहरातील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याने सध्या शहरात जोमाने विकास कामे होत असल्याचे चित्र आहे. या विकास कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे.
विकासात मागे पडलेल्या कोपरगाव शहराची धुळगाव अशी ओळख झाली होती. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच मुख्य रस्त्यांबरोबरच अनेक प्रभागातील रस्त्यांचा देखील विकास खोळंबला होता. स्वच्छता व आरोग्याचा देखील प्रश्न न सुटल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. आ.आशुतोष काळे यांनी शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी व नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला.
सर्वच मुख्य रस्त्यांचा विकास झाल्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. शहर सुशोभिकरण, विविध समाजाचे सामाजिक मंदिर, स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमी विकासासाठी देखील आ. काळे यांनी निधी उपलब्ध केल्याने मागील अनेक वर्षापासून विकासापासून दूर असणाऱ्या कोपरगाव शहरात असंख्य विकास कामे पूर्ण झाली आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक 4 वडांगळे वस्ती, प्रभाग क्रमांक 1 समतानगर, हद्दवाढ भाग, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 3 याठिकाणी रस्ते व भूमिगत गटारी आदी कामांनी वेग घेतला असून शंकरनगर येथील पुलाचे काम सुरु असून उर्वरित प्रभागातील विकास कामे देखील लवकरच सुरु होणार आहे.
शहराचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या मुलभूत विकासाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी आ.काळे यांनी दिलेले वचन पूर्ण करतांना विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर घेवून येण्यात आ. काळे यशस्वी झाले असून कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकास कामांची घौड दौड सुरूच असल्यामुळे त्यामुळे कोपरगावकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.