नगर – शहरात कचऱ्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला असून, आता प्रत्येक प्रभागातून कचऱ्याविषयी तक्रारी येवू लागल्या आहेत. मनपाने दिलेल्या कचरा संकलनाच्या ठेक्याबाबत स्वयंभूचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे मनपाचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे कचऱ्यासंदर्भात काय निर्णये घेतात याबाबत नगरकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याच्या धर्तीवर नगर शरातील कचरा संकलन केला जाणार असल्याचे स्वयंभूने मोठा गाजावाजा करत शहर कचरामुक्त करणार असल्याचे सांगितले होते.
मात्र, असे न होता शहरात अनेकठिकाणी कचरा तसाच असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे एक प्रकारे स्वयंभू ही नगरकरांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. महानगरपालिकेकडून स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जात आहे. त्यासाठी स्वयंभूला टना मागे 1 हजार 650 रुपये मोजत आहे. शहरात दररोजचा कचरा हा अंदाजे 120 ते 130 टनापर्यंत निघत आहेत. तसेच हा कचरा नागरिकांच्या घरामधून घंटागाड्यामार्फत संकलन करण्यात येणार होता.
मात्र घंटा गाड्या ह्या घराजवळ थांबत नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे रस्त्यावर व इतरत्र कचरा टाकला जात आहे. मनपाने कचरा संकलनाचे ठेका दिला असून मनपाला वाहने खरेदी करण्याची गरज काय. असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने मनपाचा आयुक्त पदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी हे शहरातील कचऱ्याचा समस्याबाबत काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पहिले पाढे पंचावन्न; बोराटे
पहिल्या ठेकेदारापेक्षा जास्त खर्च होवूनसुद्धा कचरा वाढला आहे. महानगरपालिकेच कसलेही नियोजन नाही. एकमेव काम म्हणजे पैसे खावून तिजोरी मोकळी करायची. आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे मनपाची सूत्र गेल्याने, काही प्रमाणात सुधारणा झाली पाहिजे. नाही तर पहिले पाढे पन्नास असे म्हणणाची वेळ येऊ नये म्हणजे झाले. असे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना म्हटले.
मनपाच्या पैशाची उधळपट्टी : सातपुते
महानगरपालिकेने स्वयंभूला कचरा संकलन करण्याचा ठेका वजनावर दिला आहे. मात्र, मनपाकडे कचऱ्याचे वजन केले जाते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मनपाने कचरा संकलनाचे ठेका दिला आहे. तर मनपाला चार ते पाच कोटींची वाहने खरेदी करण्याची गरज काय? सर्वसामान्य नागरिकांकडून टॅक्स वसूल करायचा व त्या पैशाची मनपाने उधळपट्टी करायची असा प्रश्न शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी उपस्थित केला आहे.