नवी दिल्ली – कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ ने आपले शानदार तीन आठवडे पूर्ण केल्यानंतर आता चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. पहिल्या तीन आठवड्यात दमदार कमाई केल्यानंतर चौथ्या आठवड्यातही चांगली कमाई करताना दिसत आहे. भूल भुलैया 2 च्या चौथ्या शुक्रवारची आणि सम्राट पृथ्वीराजच्या दुसऱ्या शुक्रवारची कमाई जवळपास समान आहे.
चित्रपटाने 14.11 कोटींच्या ओपनिंगने सुरुवात केली होती. अपेक्षा आहे की चित्रपट लवकरच 175 कोटींच्या जवळ पोहोचेल आणि त्यानंतर तो 200 कोटी क्लबमध्ये देखील प्रवेश करू शकेल. असे झाल्यास कार्तिकच्या नावावर हा आणखी एक नवा विक्रम ठरेल.
अनीस बज्मी दिग्दर्शित, भूल भुलैया 2 हा 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैया चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते.
सम्राट पृथ्वीराज चित्रपटाचा फ्लॉप शो
सम्राट पृथ्वीराज चित्रपटाला तिकीट बारीवर सरासरी ओपनिंग मिळाली होती. तेव्हापासून चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट होताना दिसत आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने अनेक शो रद्द करावे लागले आहेत. शनिवारच्या किरकोळ 2.30 कोटींच्या कमाईनंतर चित्रपटाने एकूण 59.01 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, जे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे.
अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजपूर्वी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. राजकीय नेत्यांकडून कौतुक, प्रचंड जाहिरातबाजी यानंतरही चित्रपटावर अशी वेळ येणं खरोखरच धक्कादायक मानलं जात आहे. अक्षयच्या या चित्रपटाची स्थिती अशीच राहिली तर काही दिवसांतच चित्रपटगृहातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.