उत्रौली गटात थंडीत राजकीय हवा तापली : ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेत्यांची कसोटी
दीपक येडवे
विसगाव खोरे : भोर तालुक्यातील उत्रौली- कारी जिल्हा परिषद गटातील बहुतांशी गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गावातील सत्ता स्थापन करण्यासाठी गावकारभाऱ्यांनी कंबर कसून मोर्चेबांधणी करीत आहेत.
भोर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर थंडावलेले वातावरण चांगलेच गरम झाले आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यातच तुल्यबळ आणि प्रभावी उमेदवार देण्याची धडपड सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू आहे. हिवाळ्यातील थंड वातावरणात चुरस निर्माण झाली आहे.
बड्या नेत्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्याने तसेच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळते आहे. उत्रौली- कारी जिल्हा परिषद गटातील हातनोशी, कर्नावड, भावेखल, आपटी, आंबेघर, दुर्गाडी, गुढे, कोर्ले, कारी, करंजगाव, म्हाकोशी, म्हसर खुर्द, निगुडघर, रावडी, शिरवलीतर्फे भोर, वाठार हिमा, अंगसुळे, म्हसर बुद्रुक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आखाडा रंगणाऱ्या गावांचा समावेश आहे. भोर- वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्या गीतांजली आंबवले, आनंदराव आंबवले, या नेत्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने चुरस निर्माण झाली आहे.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या वतीने गावागावातून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजनावर भर दिला गेला आहे. यातून गावागावात पक्षाची ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमात पक्षप्रवेशांचा धडाका सुरु आहे.
स्थानिक नेत्यांचा कस लागणार
ग्रामपंचायत निवडणुकीतून नेत्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची रंगीत तालीम म्हणून सावध पवित्रा घेत आपल्या गटाचे सदस्य जास्तीत जास्त निवडून आणण्याची यशस्वी रणनिती आखत आहेत. स्थानिक नेते हे गावातील सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. इच्छुक उमेदवार गावातील हालचालीवर लक्ष केंद्रित करुन आपला प्रभाव या गावात कसे वाढेल यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने राजकीय व्यूहरचना आखत आहे.
तरुणाईतून प्रतिसाद
हातनोशी, कर्नावड, भावेखल, आपटी, आंबेघर, दुर्गाडी, गुढे, कोर्ले, कारी, करंजगाव, म्हाकोशी, म्हसर खुर्द, निगुडघर, रावडी, शिरवलीतर्फे भोर, वाठार हिमा, अंगसुळे, म्हसर बुद्रुक ही गावे निवडणुकीमुळे तापली आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना जनतेतून थेट सरपंच पदाची निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. सत्तेवर येताच शिंदे- फडणवीस सरकाराने थेट संरपंच निवडीचा निर्णय घेतल्या. त्यामुळे तरुणाईचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही थेट निवड स्थनिक नेत्यांची कसोटी ठरणार आहे.