मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला डमी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.
अर्ज मागे घेण्यासाठी अवघी 5 मिनिटे शिल्लक असताना सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. खोत यांनी माघार घेतल्याने आता भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे 5 उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील.
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, कॉंग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकात हंडोरे तर शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर हे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार आहेत. संख्याबळानुसार, भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2 आणि कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून येतील. कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार आणि भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यात लढत होईल. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मते आवश्यक आहेत.
विधानसभेत भाजपचे 106 संख्याबळ आहे. तर काही अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत आहेत. त्यानुसार भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील. मात्र, पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची व्यवस्था भाजपला करावी लागणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपला 130 पेक्षा अधिक मतांची गरज आहे. यामध्ये एवढ्या मतांची जुळवाजुळव करणे हे मोठे आव्हान भाजपपुढे पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आहे.
कॉंग्रेसचे विधासनभेतील संख्याबळ 44 आहे. त्यानुसार 27 मते मिळवून कॉंग्रेसचा 1 उमेदवार सहज निवडून येईल. त्यानंतर कॉंग्रेसकडे 17 मते अतिरिक्त आहेत. कॉंग्रेसने आपला दुसरा उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी कॉंग्रेसला आणखी 10 मतांची गरज असेल.
विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात पण राज्यसभेप्रमाणेच एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवून भाजपने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. पाचही जागा निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीत तेवढा समन्वयही राहिलेला नाही. यामुळेच राज्यसभेप्रमाणे भाजप एक जागा अतिरिक्त जिंकण्याची पुनरावृत्ती विधान परिषदेत करणार का, याकडे लक्ष लागले आहे.