अहमदनगर : रायगड जिल्ह्यातील पेण येथील ३ वर्षाच्या लहान मुलीला जगाची निट ओळख झाली नाही. तिला तितकी दृष्टी आली नाही अश्या बालिकेला पहाटे घरात झोपलेल्या अवस्थेत उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आदेश मधुकर पाटील या 34 वर्षाच्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भाजपच्या राज्य सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली असुन या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. राज्यात सध्या प्रशासनाचे नियंत्रण व गृहखात्याची भिती राहीली नसल्याने वारंवार अशा घटना घटत असल्याची खंत कोल्हे यांनी व्यक्त केली.
स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, घटना लिहीलेल्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांचा वारसा लाभलेला आणि साधुसंतांची पवित्रभूमी असलेल्या महाराष्ट्रातील (बुधवार दि.३० डिसेंबर रोजी) रायगड जिल्ह्यातील पेन येथील आदिवासी समाजाच्या तीन वर्षीय बालिकेला घरातून उचलुन नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार करून तिचे डोळे काढले गेल्याची दुर्दैवी घटना, करोना सेंटरमध्ये महिलावर अत्याचार केला जातो. पुरूषी विकृतीमुळे अश्या अनेक घटनामध्ये महिलांवर अत्याचार करून त्यांचा शारीरिक मानसिक छळ केला जातोय. वारंवार अशा घटना घडत आहेत. अशा घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत.
एका बाजुला महीलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे तर दुसरीकडे त्यांना सुरक्षित जगण्यासाठी संरक्षण नाही. पुरुषी विकृतीची भिती महिलामधून कधी कमी होणार. महिलांमधील हे भय संपण्याकरीता महिलांसाठी शासनाने शक्ती कायदा सशक्त पणे त्वरित आणला पाहीजे. आत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देवून पळवाट नसलेला कायदा लागू केल्यास इतर पुरूषांना असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही. गुन्हा करताना प्रत्येकजणाने चारवेळा विचार केला पाहीजे. अत्याचार करणारा नराधम कोणत्याही जाती धर्माचा, राजकीय पक्षाचा असो किंवा कोणाच्या जवळचा नातलग असला तरी त्याला कोणीही पाठीशी घालु नये.
राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते नेहमी म्हणतात की, फुले,शाहु,आंबेडकरांचा वारसा घेवून आपले कार्य चालु आहे तर मग महिला मुलीवरील अत्याचाराच्या घटना आजूनही थांबत का नाहीत. आत्याचाराची एखादी घटना घडली तर त्या ठराविक समाजाचे लोक रस्त्यवर उतरतात मात्र इतरांच्या महिला -मुलीवर अशी घटना घडली तर गप्प बसतात हे दुर्दैव आहे.
परदुःख शितल असे मानण्याची गरज नाही. प्रत्येकांना लेकी बाळी आहेत. पुरुषी विकृती किळसवाणी होत असल्याने आत्याचाराच्या घटनेकडे कोणीही दुर्लक्ष करु नये. आपल्याही महिला बाबत कधी काय घडेल सांगता येणार नाही. ति विकृती दारा घरापर्यंत कधी येईल सांगता येणार नाही. समाजाने महिला- मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहीजे. पेन मधील बालिकेवर अत्याचार करण्यापूर्वी त्या नराधमाने आश्या घटना करूनही त्याला योग्य शिक्षा न झाल्याने त्याचे धाडस वाढल्याने पुन्हा तिन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन निर्दयपणे खुन केला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तेव्हा कडक कायद्याची अंमलबजावणी करून त्वरीत शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.