पिंपरी -एक्स्प्रेसवेवर चारचाकीच्या झालेल्या अपघातात विव्हळत असलेल्या जखमींना मुख्यमंत्र्यांचे ओएसडी (विशेष कार्यकारी अधिकारी) डॉ. राहुल गेठे यांनी मोलाची मदत केली. अपघातस्थळी थांबून पोलीस व अन्य यंत्रणांशी संपर्क साधत, जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून घेऊन गेल्यानंतर गेठे पुढील प्रवासाकरिता रवाना झाले. गेठे यांच्या या मदतीमुळे अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळू शकले. रिटा झेव्हीअर गोन्झाल्विस, डेंजील गोंजालवीस आणि झेवीअर डॉमनिक (सर्व जण रा. ठाणे, मुंबई) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, कात्रज-बंगळूरू द्रुतगती महामार्गावरून चारचाकी वाहन (क्र. एमएच03 सीएम 6146) पुण्याकडे येत असताना शनिवारी (दि.5) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर सोमाटणे फाटा येथेचारचाकी वाहनाला भीषण अपघात झाला. महामार्गालगत असलेल्या संरक्षक लोखंडी कठड्याचा मोठा पत्रा घुसला. या जीवघेण्या अपघात नेमके एक ज्येष्ठ महिला व पुरुष वाहनात अडकले. ते जिवाच्या आकांताने ओरडत राहिले. पण धडकलेल्या वाहनामध्ये लोखंडी कठड्याचा भलामोठा पत्राच घुसल्याने आजी-आजोबांना बाहेर काढणे अवघड होते. मदतीसाठी कोणी थांबत नव्हते. तेवढ्यात मुंबईहून पुण्याकडे निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गेठे अपघाताच्याठिकाणी थांबले. त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत, तत्काळ फोनाफोनी करून पोलीस आणि अन्य यंत्रणेला काही मिनिटांत घटनास्थळी आणले. अखेर अपघातग्रस्त वाहनाचे दरवाजे कापून पाच मिनिटांत जखमींना बाहेर काढण्यात यश आले. डॉक्टर असलेल्या गेठेंनी आजी-आजोबांना किमान उपचार देऊन धीर दिला. त्यानंतर डॉ. गोठे यांची तत्परता आणि धाडसामुळे या आजी आजोबांबरोबरच त्यांच्या मुलाचाही जीव वाचला. दौऱ्यात असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी तिघांवर मोफत उपचाराचा आदेशही दिला.
मोटारीचे दरवाजे कापावे लागले
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या चारचाकी वाहनाला शनिवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सोमाटणे फाट्याजवळ अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की सुसाट आलेली कार रस्त्यालगतच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दुजाकाचा भलामोठा पत्रा काचेतून मागील बाजुला बसलेल्या आजी-आजोबांपर्यंत पोचला. यामुळे हे वाहन “लॉक’ झाले. वाहनचालक बाहेर फेकला गेला. अपघातात कारमधील आजी-आजोबा आरडाओरड करू लागले; पण काही केल्या मदत मिळाली नाही. मुंबईहून पुण्याकडे निघालेले डॉ. गेठेंनी अपघात पहिला आणि आपली गाडी थांबवून थेट आजी-आजोबांना बाहेर काढण्यासाठी स्वतः धडपड केली. तरीही, त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते. शेवटी आपत्कालीन यंत्रणा बोलावून कारचे दरवाजे कापले आणि आजी-आजोबांना सुरक्षितपणे बाहेर काढले. भीषण अपघाताने प्रचंड घाबरलेल्या आजी-आजोबांना डॉ. गेठेंनीच जागेवर उपचार केले. त्यानंतर ऍम्ब्युलन्समधून तिघांना पवना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या तिघांवर तातडीने आणि योग्य उपचार होतील यासाठी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्यानंतरच डॉ. गेठे निघून आले.