पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) -वेदांत फॉक्सकॉनपाठोपाठ आता टाटा एअर बस हा सुमारे 22 हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचा प्रकल्प देखील गुजरातला गेला आहे. यामुळे मुख्यमंत्री साहेब आमच्या रोजगाराचे काय? असा प्रश्न उपस्थित करणारी पाच हजार पत्रे पाठवून पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार आहे.
या पत्रात म्हटले आहे की, नोटबंदी, जीएसटी व इतर करांचा प्रभाव असल्यामुळे उद्योग व व्यापार क्षेत्रात मंदीचे सावट आहे. अशात तरुणांच्या हाताला काम देण्यात सरकारला अपयश आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील भाजपा-शिंदे सरकार एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प गुजरातला हलवित आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हलविल्यानंतर काही दिवसांतच आता टाटा एअर बस हा प्रकल्प गुजरातला हलवला आहे. नागपूर येथील मिहान येथे प्रकल्प उभा करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा उद्योग समुहाचे प्रमुख रतन टाटा यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाशिकच्या ओझर येथील एचएएल या अनुभवी कंपनीत हा प्रकल्प राबविण्याची रतन टाटा यांच्याकडे पत्रद्वारे मागणी केली होती.
मुख्यमंत्री साहेब आपण गुजरातसाठी काम करत आहात का?, तीन महिन्यात मोठे तीन प्रकल्प गुजरातलाच का पाठविण्यात आले?, महाराष्ट्रात लाखो युवक व युवतींच्या हाताला काम देणारे हे महत्वाकांक्षी प्रकल्प तीन महिन्यांच्या सत्ताकाळात गुजरातमध्येच का हलवले जात आहेत?, गुजरात सोडून इतर राज्यात का हे प्रकल्प विकसित केले जात नाहीत?, महाराष्ट्रात लाखो हाताला रोजगार मिळवून देणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रॅग व आता टाटा एअर बस हे तिन्ही प्रकल्प गुजरातला हलविले, गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींना गिफ्ट म्हणून हे प्रकल्प त्याठिकाणी विकसित करण्याचा घाट घातला जातो का?, असा जाब राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे विचारला आहे.
…तर स्व. बाळासाहेबांनी काय केले असते?
पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री स्वत:स वारंवार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार असल्याचे पोट तिडकीने सांगतात. जर बाळासाहेब आज हयात असते तर आपला हा गुजरात गुलामी कारभार पाहून त्यांनी काय केले असते? याबाबत आपण एक राजकीय वारसदार म्हणून राज्यातील जनतेला सांगावे, असा जाब पत्राद्वारे विचारण्यात आला आहे.