मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेतून बरे झाल्यानंतर आज पहिल्यांदाच मंत्रालयातील आपल्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना पेपरलेस कारभारावर भर देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आज उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला पाहिजे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाला भेट दिल्याचे ऐकून आपल्याला समाधान वाटले अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्री मधल्या काळात मंत्रालयात आले नसले तरी त्यांनी त्यांच्याकडील फायलींवर निर्णय घेतले कोणतेही काम त्यांच्यामुळे अडून राहिले नाही.
61 वर्षीय मुख्यमंत्र्यांवर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईतील रुग्णालयात मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यापूर्वी, कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका घेतल्या. अनेक कार्यक्रमांना त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरीही लावली होती.
बुधवारी ठाकरे यांनी मंत्रालयातील सामाजिक न्याय, महसूल, सामान्य प्रशासन, गृह, विधी आणि न्यायपालिका विभागांना भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले की, 6 एप्रिलपासून अधिकृत फायली आणि कागदपत्रे डिजिटल केली जात आहेत आणि अनावश्यक कागदपत्रे नष्ट केली जात आहेत.ठाकरे यांनी मंत्रालयाच्या लॉबीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.