नागपूर: शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी देण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली असताना, आपल्या भाषणात शेतकऱ्यांसाठी 1000 रुपयांचा सुद्धा उल्लेख करू नये, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. हे विश्र्वासघातकी सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याच्या इतिहासातील अभिभाषणावरील हे पहिले मुख्यमंत्र्यांचे उत्तराचे भाषण असेल, ज्यात शेतकऱ्यांचा साधा नामोल्लेख सुद्धा नाही. विदर्भात हे अधिवेशन होत असताना विदर्भाच्या संदर्भात अवाक्षर सुद्धा नाही.
ही केवळ खुर्ची वाचविण्याची कवायत तेवढी आहे. दोन पक्षांची ‘खूषमस्करी’ करून त्यांना खुश ठेवणे एवढी एकमेव कला त्यांनी आत्मसात केल्याचे दिसून येते. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे, म्हणून आम्ही विधानसभेतून आज सभात्याग केल्याचे फडणवीस म्हणाले.