नागपूर : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावा. यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर “दिशा’सारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महिलांमध्ये कुठल्याही प्रकारचे भय राहाता कामा नये, हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. महिलांना सुरक्षित वावरता आले पाहिजे, यासाठी अस्तित्वातील नियम आणि कायदे कठोरपणे राबवण्याबरोबरच कमीत कमी वेळेत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
याबाबत मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा झाली आहे. दिशा कायद्याबाबत माहिती घेतली असून तशा प्रकारचा कायदा करण्यासाठी अस्तित्वातील कायद्यांमध्ये काय बदल करणे गरजेचे आहे, यासंदर्भात विधि आणि न्याय विभागाचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.