माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
कराड: सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना आपत्तग्रस्तांना मदत पोहचविण्यात भाजपा सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. हे झाकण्यासाठीच फडणवीस सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पूरस्थिती वेळी या सरकारचे आपत्ती व्यवस्थापनचे मंत्रीच जागेवर नव्हते, यावरुन सरकारला पूरस्थितीचे कितपत गांभीर्य आहे. हे स्पष्ट होते. या पूरस्थितीला सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्री सरळसरळ खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात आर्थिक मंदी निर्माण झाली असून रोजगाराची अवस्था बिकट बनली आहे. याचा फटका महाराष्ट्रातील जनतेला बसत आहे. याकडे सरकारचे लक्ष नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे सातारा जिल्ह्यात यावेळी सरासरी 700 ते 800 टक्के पाऊस झाल्याची खोटी माहिती देत सर्वांचीच दिशाभूल करीत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्र्यांकडून घेतलेल्या चुकीच्या आकडेवारीवरुन ही विधाने करीत आहेत, ती त्यांनी मागे घ्यावीत.