नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसने उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान न करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशी अंतर्गत करार केल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत, त्यांची अनेकदा मुख्यमंत्र्यांशी भांडणे होत असत.
काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना दार्जिलिंगमध्ये बोलावले आणि त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांच्यासह दार्जिलिंगच्या गव्हर्नर हाऊस येथे बैठक घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी धनखड यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले, याचा अर्थ त्यांच्यात दार्जिलिंग करार झाला होता.
त्यांनी पुढे आरोप केला की ममता बॅनर्जी, हेमंता बिस्वा सरमा आणि राज्यपाल यांच्यात एक गुप्त करार झाला होता की त्यांनी भाजपला मदत केली तर बंगाल मध्ये भाजपच्या केंद्र सरकारकडून त्यांना मदत होईल. त्यांच्या या धरसोड वृत्तीमुळेच यशवंत सिन्हा जे ममतांचे उमेदवार होते त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.
विरोधकांशी सल्लामसलत न करता उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांचे नाव घोषित करण्यात आल्याच्या आरोपाविषयी ते म्हणाले की हा दावा खोटा आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच मार्गारेट अल्वा यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तरीही आज ममता यांना मतदानापासून दूर राहायचे आहे. म्हणजे मार्गारेट अल्वा यांना मतदान करण्याऐवजी धनखड जास्तीत जास्त मतांनी विजयी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणूनच मी म्हणत आहे की हा दार्जिलिंग करार आहे.