मुंबई – राज्यात आरक्षणाचा विषय गंभीर आहे. याकडे सत्ताधारी गटाने आणि विशेषत: मंत्र्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. हा गंभीर विषय असल्याने मराठा-ओबीसी वादात दोन्हीकडच्या लोकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
आव्हाड म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री जरांगे पाटील यांची खिल्ली उडवत मिमिक्री करत आहेत. त्याचा एक व्हिडिओ आपण पाहिला. हा प्रकार राज्याच्या संस्कृतीला अशोभनीय तर आहेच, सोबतच आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील जातीय सलोखा टिकवायचा असेल तर अशा प्रलोभनांपासून दूर राहायला हवे, अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल मणिपूरच्या दिशेने व्हायला वेळ लागणार नाही, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या मागणीला विरोध करत छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावे पार पडत आहेत.