रासायनिक प्रदूषणाला नागरिक कंटाळले : जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
कुरकुंभ -येथील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यापासून होणारे प्रदूषणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एमआयडीसीमधील काही कंपन्यांच्या प्रदूषणाला अक्षरशः ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत. मात्र, प्रदूषण थांबण्याचे चित्र दिसत नाही. परीसरातील विद्यार्थ्यांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषणाला कंटाळून कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन होणाऱ्या प्रदूषणावर वेळीच लक्ष देण्याची मागणी केली आहे.
1989 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीसाठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या. काही थोडे पैसे लोकांच्या हातावर ठेवून मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आणून बसविल्या गेल्या. या कंपन्या घातक रसायन जल, वायू अथवा घन स्वरूपामध्ये सोडतात. या कंपन्याविरुद्ध यापूर्वी आंदोलने केली आहेत.
मात्र, ही आंदोलने कंपन्यांनी अधिकारी वर्गांना हाताशी धरून मोडीत काढली. या प्रदूषणाचा लोकांना त्रास होत आहे. सतत दुर्गंधी पसरली असते. 12 किलोमीटर परिसरामध्ये प्रदूषण झाले आहे. कुरकुंभपासून 6 ते 8 कि. मी.च्या परिसरात प्रखर वायू प्रदूषण जाणवत आहे.
कुरकुंभ परिसरात रासायनिक प्रकल्प सुरू होऊन तीस वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, प्रदूषणावर तोडगा निघाला नसून, दिवसेंदिवस हे प्रदूषण वाढतच आहे. दहा किलोमीटरच्या परिसरातील नैसर्गिक परिस्थिती बदलत आहे. पुढील काळात येथील मानवी जीवन विविध रोगराईच्या विळख्यात सापडल्याशिवाय
राहणार नाही.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाने पुन्हा डोके वर काढले आहे. सरकार दरबारी अनेकवेळा तक्रारी करून तत्कालीन जिल्हाधिकारी, विविध मंत्र्यांमार्फत आदेश देऊन यावर नियंत्रण ठेवणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नाही. काही कंपन्यांनी सांडपाणी जमिनीत सोडण्याचे अनेक पुरावे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असताना त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी आदेश दिले असताना यावर उपाय न करणे म्हणजे कुरकुंभ येथील हजारो नागरिकांच्या जीवाला वेठीस धरण्यासारखे आहे.
-राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ.