फलटण – “फोन पे’वरुन 4200 चा रिफंड होणार असल्याचे आमिष दाखवून फलटण येथील युवतीला 66 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
राजगौरी शशिकांत कदम (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांना दि. 27 जुलै रोजी दुपारी तीनच्या दरम्यान पेटिट कस्टमर केअरमधून बोलतोय म्हणून फोन आला. या फोनमध्ये “तुम्हाला फोन पे कडून 4200 रुपये रिफंड होणार आहेत, ते तुम्हाला हवे असतील तर लिंकमधून ट्रान्जक्शन करा,’ असे सांगितले गेले. त्याप्रमाणे कदम यांनी ट्रान्जक्शन केले. दरम्यान, त्यांच्या खात्यामधून 66 हजार 770 रुपये या अज्ञाताने लांबवले.
याबाबतीत कदम यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून फलटण शहरासह फलटण तालुक्यामध्ये सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले असून काही जण आपल्या प्रतिमेच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करण्यासाठी घाबरत आहेत.
तर काही जणांच्या खात्यातून हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत रक्कम लंपास केली जात असून जे नागरिक नेट बॅंकिंग अथवा यूपीआय वापर करतात, त्यांनी यापुढे जपून व्यवहार करणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळामध्ये सायबर हल्ले वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचा फटका फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना व लघु उद्योजकांना बसत आहे.
व्यावसायिकांनी व नागरिकांनी सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे, असे पोलीस निरिक्षक प्रताप पोमन यांनी स्पष्ट केले.