सप्टेंबरपासून धान्य वाटप होणार बंद; ग्राहकांचा अंगठा घेण्याच्या सक्तीला विरोध
कराड (प्रतिनिधी) – करोनाचा प्रसार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाही राज्य व केंद्र शासनाने चालू महिन्यात धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहकांचा अंगठा घेऊनच धान्य वाटप करावे, अशी सक्ती केल्याने राज्यातील व जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार दि. 1 सप्टेंबरपासून 2020पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचे धान्य वाटप करणार नाहीत.
केंद्र सरकारच्यावतीने करोना संसर्गजन्य काळात राज्यातील गोरगरीब केसरी कार्डधारकांना महिन्याला मानसी प्रति पाच किलो मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. हे वाटप एप्रिल महिन्यापासून सुरू आहे. राज्यातील ग्राहकांना गेल्या तीन महिन्यापासून धान्याचे वाटप स्वस्त धान्य दुकानदार प्रामाणिकपणे करत आहेत. मात्र, त्यांना शासनाच्यावतीने वाटप केलेल्या धान्याचे मोबदलाही दिलेला नाही.
पुन्हा नव्याने पुढील तीन महिन्यासाठी मोफत धान्य वाटप करण्याचे नियोजन देण्यात आले आहे. हे नियोजन देताना सरकारने संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना मशीनद्वारे ग्राहकाचा अंगठा घेऊन मगच धान्य वाटप करण्याची सक्ती केली आहे.
मात्र, सध्या ग्रामीण व शहरी भागात करोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. प्रत्येक गावात प्रत्येक शहराच्या वार्डात दररोज किमान दहा ते वीस लोक करोनाबाधित होत आहेत. अशा अडचणीच्या स्थितीत स्वस्त धान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांना ग्राहकाचा पॉश मशिनवर अंगठा घेऊन धान्य वितरणाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, करोनाचा वाढता प्रसार असताना आंगठा घ्यायचा म्हणजे करोनाला आंमत्रण दिल्यासारखेच आहे. सोशल डिस्टन्स कसे राखायचे? करोना आरोग्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे.
ग्राहकाचे तोंड व मशीनचा अंगठा घेणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाजवळ पोहचते. त्यामुळे श्वासनातून करोनाचा संसर्ग होण्याचे होण्याचा मोठा धोका आहे. प्रशासनाने प्रत्येक ग्राहकाचा पॉस मशिनवर अंगठा घेण्याचा व धान्य वितरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा एक सप्टेंबरपासून कोणत्याही स्वरूपात धान्य वितरण करणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री, पुरवठा विभाग सचिव व राज्यातील जिल्हाधिकारी यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
पॉश मशिनवर अंगठा न घेता पूर्वीप्रमाणे धान्य वाटप करण्यास परवानगी द्यावी. गेली तीन महिने ग्राहकांना कोणतीही तक्रार न येता धान्याचे वितरण झाले असतानाही शासन आज करोना महामारी काळातच अंगठ्याचा ठसा घेण्याची सक्ती का करते, असा सवाल सातारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष के. एम. पवार व उपाध्यक्ष विनोद पाटील यांनी केला आहे.
विमा संरक्षण कधी देणार?
करोना महामारीच्या काळात स्वस्त धान्य दुकानदार संघटना स्वस्त धान्य दुकानदारांना राज्य शासनाच्यावतीने विमा संरक्षण देण्यात येणार होते. मात्र, आज करोना संसर्ग येऊन सहा महिने उलटून गेले तरी शासनाच्यावतीने विमा संरक्षण देण्यात आले नाही. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदनही दिले आहे. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. दुकानदाराबद्दल असे घडल्यानंतरच यावर निर्णय होणार का? असा प्रश्न दुकानदार विचारत आहेत.