पुणे -पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेला पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी शुक्रवारी तीव्र विरोध दर्शवला. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांमध्ये बागायती क्षेत्र असल्याने विमानतळ पुरंदर तालुक्यातच, मात्र प्रस्तावित जागेच्या पुढील तीन गावांमध्ये प्रकल्प राबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार जगताप यांनी विमानतळाच्या जागेला विरोध केला. त्यामुळे प्रकल्पबाधितांना द्यायच्या परताव्यांबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही. विमानतळासाठी बाधित होणाऱ्या पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे.
त्याऐवजी दोन किलोमीटर पूर्वेला पांडेश्वर, रिसे आणि पिसे या तीन गावांच्या परिसरात विमानतळ करण्यास हरकत नाही. प्रकल्पासाठी आवश्यक जागा या तीन गावांतून मिळू शकेल. तसेच या गावांमध्ये फारसे बागायती क्षेत्र नाही, असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, प्रकल्पासाठी आवश्यक बहुतांशी जागांचे सर्वेक्षण झाले आहे. केंद्र, राज्य सरकारसह संरक्षण विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता जागेत बदल करणे योग्य होणार नाही. याशिवाय भविष्यात विमानतळ विस्तारीकरणासाठी पांडेश्वर, रिसे आणि पिसे ही तीन गावेही समाविष्ट करण्यात आली आहेत.
याबाबतचे सर्व अभिलेख महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी एमएडीसीच्या मुंबईतील कार्यालयातून प्रकल्पाशी संबंधित सर्व अभिलेख आमदार जगताप यांना दाखवावेत. तसेच त्यामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) काय निष्कर्ष काढले आहे, त्याबाबत त्यांना सविस्तर माहिती द्यावी, असे सांगितले.