पोलिसांच्या निष्क्रयतेवर दिल्लीत तीव्र नाराजी… प्रभातचा खास ग्राउंड रिपोर्ट
नवी दिल्ली : मोटारींचे सांगाडे, फुटलेल्या काचा, जळालेली दुकाने आणि घरे, कर्ता गमावलेल्या घरांतील आक्रोशाचे टाहो आणि रस्त्यावर पडलेले असंख्य दगड हे सोमवारपासून धुमसणाऱ्या राजधानीचे चित्र होते. गुरूवारी बळींची संख्या 34 वर पोहोचली तर जखमींनी 200 चा टप्पा गाठला. मौजपूर, जाफराबाद, चांद बाग, यमुना विहार भागाला याचा सर्वाधिक फटका बसला. या भागात गुरूवारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 45 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पण ज्यावेळी हिंसाचार उफाळला होता, लोकांचे खून पडत होते, दगडफेक खुलेआम होत होती, घरे वाहने पेटवली जात होती त्यावेळी हे पोलिस बेपत्ता होते. हा सर्व दंगलग्रस्त भाग दिल्ली पोलिस मुख्यालयापासून अवघ्या 12 किमीच्या परिघात आहे. या भागातील लोकांशी बोलल्यावर एकच वाक्य समान आढळते… दिल्ली पोलिसांनी काहीही केले नाही. भजनपूरा येथे पेट्रोलपंप पेटवून दिला. त्याच्या मालकाची त्यांच्या मित्रांनी सुटका केली. त्यांनी सांगितले, अचानक 10 -12 जण येऊन पैसे लूटून नेऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ सुमारे दोन हजार जणांचा जमाव तेथे आला. त्यावेळी तेथे असणाऱ्या पोलिसांपैकी चार जण बाथरूममध्ये जाऊन लपून बसले. तर उर्वरीत मख्खपणे जाळपोळ पहात होते. पोलिस कोठे नजरेस पडले नाहीत. जे पोलिस होते ते बघेच होते, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, त्यांनी दंगलखोरांना आवरा अशी विनंती पोलिसांना केली, त्यावेळी कारवाई करण्याचे आम्हाला आदेश नाहीत असे त्यांनी सांगितले. पोलिस म्हणत होते, जो तुम्हे करना है वो तुम करो, जो उन्हे करना है वो वो करें।आम्हाला कारवाई करण्याचे आदेश नाहीत, असे पोलिस सांगत होते.
शेजारच्या यमुना विहारमध्ये एकाचे हॉटेल पेटवले. त्यांनी पोलिसांच्या अशाच वर्तनाची तक्रार केली. ते म्हणाले, सोमवारी माझ्या दुकानावर हल्ला झाला. दंगलखोर येताच आम्ही हॉटेलचे शटर ओढून घेतले. त्यामुळे ते वाचेल असे मला वाटले. मात्र त्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकण्यास सुरवात केली. तेथे 40 ते 50 पोलिस उभे होते.
आज परिस्थिती खूप शांत आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याने आम्ही समाधानी आहोत. कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, हा नागरिकांना विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलिस जनतेच्या मदतीसाठी आहेत.
एसएन. श्रीवास्तव,
विशेष पोलिस आयुक्त
पोलिस एवढे होते असे म्हणताच ते म्हणाले, होय 40-50 पोलिस होते. तर दंगलखोर दोन हजाराच्या घरात होते. आम्ही त्यांना म्हणालो, तुम्ही संख्यने कमी आहात हे मान्य आहे. मात्र दंगलखोरांना पांगवण्यसाठी तुम्ही हवेत गोळीबार करा. तुम्ही काही तरी करा नाही तर आम्ही सर्व गमावून बसू. त्यावेळी पोलिस म्हणाले, आम्हाला कोणताही आदेश नाही. आदेश आल्याशिवाय आम्ही काहीही कारवाई करत नाही, असे त्यांनी सांगितले.
पुन्हा दुकान उभे करणार का?े विचारता ते एकदम कोलमडून गेले. ते म्हणाले, कैसे करें? अब तक जो कुछ भी था सब लगा दिया था… मेरा लोन था, पापा का लोन था… सब लगा दिया था। जो उन्हे कराना था वो कर दिये… कुछ नही कर सकते… नेता लोग है.. इनका क्या होगा… सब अपनी रोटी शेक रहे है… जनता पीस रही है?
शेजारच्या चांदभाग भागात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या फळाच्या दुकानाकडे आणि घराकडे विमनस्क अवस्थेत उभा होता. तेथे त्यांचे कुटुंब 1982 पासून राहते. ते म्हणाले, तेथे शांतता येण्यासाठी आणखी पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. त्या दिवशीपण पोलिस होते. मात्र जेवढे आवश्यक होते तेवढ्या संख्येने नव्हते. पोलिस येथे होते. मात्र, ते दगडफेक करणाऱ्यांना मदत करत होते. घरात पडलेले अश्रुधुराच्या चार गोले दाखवत ते म्हणाले, माझ्याकडे जे काही होते ते सारे जळून गेले आहे. संपूर्ण घर खाक झाले आहे.