राहाता – साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने साई बाबांच्या व्दारकामाई मंदिराच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. आता रात्रीची शेजारती होईपर्यंत द्वारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. गुरुवारी (दि.14 जुलै) पासून द्वारकामाई मंदिरासंदर्भातला हा नवीन बदल लागू होईल, अशी माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली
यापूर्वी द्वारकामाई मंदिर पहाटे 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंतच भाविकांना दर्शनासाठी खुले असायचे. मात्र, आता दर्शन वेळेत बदल करण्यात आल्याने द्वारकामाई मंदिर हे पहाटे 5 ते साई समाधी मंदिरातील शेजआरती होईपर्यंत म्हणजेच रात्री 10:30 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. द्वारकामाई मंदिराची दर्शन वेळ एक तास वाढवण्यात आल्याने साई भक्तांनी आनंद व्यक्त करत साईबाबा संस्थानच्या निर्णयाव्हे स्वागत केले आहे.
1918 साली महानिर्वाणानंतर बुटी वाड्यात साईबाबांची समाधी बनवण्यात आली. आज त्या ठिकाणाला समाधी मंदिर म्हणून ओळखले जाते. मात्र, साईबाबा शिर्डीत आल्यापासून ते महानिर्वाण होईपर्यंत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य द्वारकामाई मंदिरात व्यथित केले. या ठिकाणाहून साई बाबांनी अनेक भाविकांना शिकवण, उपदेश, गोर-गरीबांची रुग्ण सेवा व अन्न दिले. तसेच याठिकाणी साई बाबांनी अनेक भाविकांना आपल्या लिला देखील दाखवील्या. त्यामुळे द्वारकामाई मंदिराबाबत साई भक्तांच्या मनात विशेष आस्था आहे.
वर्षाकाठी देश विदेशातून शिर्डीत साई समाधीच्या दर्शनासाठी येणारे करोडो साईभक्त, समाधीसह व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान आदी ठिकाणी प्राधान्याने दर्शनाकरीता जातात. दररोज अनेक भाविक तासनतास द्वारकामाई मंदिरासमोर बसून साई भक्तीत तल्लीन झाल्याचे चित्र बघायला मिळते. तर शिर्डी ग्रामस्थही आपल्या दिवसाची सुरुवात द्वारकामाईच्या दर्शनाने करतात.
द्वारकामाई मंदिराचे महत्व लक्षात घेता साई संस्थान व्यवस्थापन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शेजारती होईपर्यंत रात्री 10:30 द्वारकामाई मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे.