मुंबई – भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं, “कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली…’ असं ते म्हणाले असून, त्यांच्या या विधानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानावरून यू-टर्न घेतला असल्याचं दिसून येत आहे.
वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी आणि सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून तीव्र संताप व्यक्त केला. पण, आज चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात समाज माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा खुलासा केला आहे.
यावेळी ते म्हणाले, “आता जर यांचं म्हणणं असेल तर वर्गणी म्हणायला पाहिजे होतं, तर त्या काळात हे शब्द नव्हते, त्यावेळी भीक मागून मी संस्था उभी केली असं प्रचलित वाक्य होतं. माझं पहिलं वाक्य काय आहे, सगळ्यांबद्दल आदर करणारं वक्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरू केल्या असं मी म्हटलं आहे. ते सगळे सरकारवर अवलंबून राहिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या.
भीक म्हणजे काय, आज आपण नवरात्र, गणपतीला, आंबेडकर जयंतीला जे जाऊन फिरतो आम्हाला वर्गणी द्या. मी काय केलं, खांद्यावरच गमच्छा काढला आणि अॅक्शन करून वक्तव्य केलं. जर माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी इतका छोटा माणूस नाही. माझ्या मनात श्रद्धा आहे, माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले आहे”. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त विधान….
पैठणमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “देशात शाळा कोणी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायची आहे, मला पैसे द्या. त्या काळात 10 रुपये देणारे होते. आता 10-10 कोटी रुपये देणारी लोक आहेत’, असे विधान त्यांनी केले.