पुणे – राज्यात 13 मार्चपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर आजपासून (दि.12) पुढील दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी गारपीट झाली होती. तर मध्य महाराष्ट्रात काही जिह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता. पण, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा तापमानात वाढ झाली होती. शनिवारी सांताक्रुझ केंद्रावर सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. कोकणात सरासरीपेक्षा 6 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली आहे. पण, पुढील दोन दिवसात पुन्हा तापमानात घट होणार आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर 14 आणि 15 मार्च रोजी विदर्भातील तूरळख ठिकाणी पावासाची शक्यता आहे.