पुणे – मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावली आहे.
मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस कोसळल्यानंतर आता याठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे. पण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले (WML).येत्या 24 तासात ते आणखी तीव्र (Depression) होण्याची शक्यता IMD ने वर्तवली,तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता.परीणामी पश्र्चिम किनारपट्टीवर पुढचे ३,४दिवस वारे जोरदार असतील,राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता. pic.twitter.com/9W8nixwzHC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 12, 2021
आज पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही पुढील काही तासांत पाऊस झोडपणार आहे.
हे जिल्हे येलो अलर्टमध्ये
संपूर्ण विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज विदर्भात बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे