किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी मदन भोसले यांच्या पॅनेलच्या 19 वर्षांच्या सत्तेला आमदार मकरंद पाटील व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सुरूंग लावला. दोन्ही बंधूंनी अचूक डावपेचामुळे मोठ्या मताधिक्याने सत्ता मिळविली. त्यामुळे विजयाचे श्रेय या दोन्ही बंधूंचे नक्कीच आहे. आणि तसे ते मदन भोसले यांचेही आहे. त्यांच्या कारभाराविषयी ऊसउत्पादकांमध्ये असणारी प्रचंड नाराजी व्यक्त झाल्याने शेतकरी बचाव पॅनेलला मोठा दणदणीत विजय नोंदविता आला. खंडाळ्यापाठोपाठ किसन वीर कारखाना ताब्यात घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी विजयाची परंपरा पुढे नेली. मात्र, कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
अखेर किसन वीर सहकारी साखर कारखान्यातील मदन भोसले यांची सद्दी मतदारांनी संपवली. अतिआत्मविश्वासातून त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. कारखान्याची देणी देणार आणि कारखाना पुन्हा सुरू करणार, असे सांगत आपण केलेल्या नव्या 35 हजार मतदारांमुळे पुन्हा सत्ता मिळणार, असा त्यांचा विश्वास फोल ठरला. हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला ऊस आणि शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान या वस्तुस्थितीपर्यंत ते पोहचूच शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि त्यांनी वाढविलेल्या मतदारांच्या मनात चाललेली खळबळ त्यांना जाणता आलीच नाही.
आपण वाढवलेले मतदार कायम आपल्याच बाजूने राहतील, हा भ्रम शेतकऱ्यांनी दूर केला. मदन भोसले काही करतील ही आशा वाटत असली तरी वस्तुुस्थितीचे चटके सोसणारे शेतकरी आतून अस्वस्थ होते. त्यांच्याच गळ्याशी यावे अशी स्थिती निर्माण करून ठेवल्यामुळे अखेर द्यायचा तो दणका भोसले आणि त्यांच्या पॅनेलला मिळाला. याउलट दांडगा जनसंपर्क, जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोहोळ, वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा यामुळे मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी नेटक्या नियोजनाने मतदारांची नाराजी आपल्या बाजूने खेचून आणली. किसन वीर यांच्या प्रयत्नांतून जांबच्या माळावर सुरू झालेला हा कारखाना जिल्ह्यात आदर्श मानला जात होता. माजी खासदार तत्कालिन अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांना पराभूत करत मदन भोसले यांनी 2003 मध्ये कारखान्यात सत्तांतर केले होते. आणि आता लक्ष्मणराव पाटील यांच्या दोन मुलांनी मदन भोसले यांना पराभवाची धूळ चारत सत्तांतर केले.
भोसले यांच्या 19 वर्षांच्या काळात कारखान्याने वेगवेगळे उपक्रम राबवित चांगली प्रतिमाही निर्माण केली होती. शेवटची दोन वर्षे कारखान्याला वेगळे वळण देऊन गेली. या मधल्या काळात मदन भोसले यांनी प्रतापगड व खंडाळा हे दोन्ही कारखाने “किसन वीर” बरोबर घेतले. त्या दोन्ही कारखान्यांमुळे “किसन वीर”च अडचणीत आला. कर्जाचा बोजा वाढत चालल्याचे आरोप होत गेले. एकाबाजूने कारखाना डबघाईकडे चालल्याची टीका होत असताना त्याकडे दुर्लक्ष करत मदन भोसले यांनी आपला हेका कायम ठेवला. कॉंग्रेसकडून ते भाजपमध्ये गेले. केंद्रातील भाजप सरकारकडून, नारायण राणेंकडून व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदत मिळून कारखाना वाचविता येईल, हा त्यांचा अंदाज कधी फसला ते लक्षातही आले नाही. या कारखान्याने ऊस वेळेवर न्यावा, वेळेवर बिले द्यावीत एवढी अपेक्षाही ते पूर्ण करू शकले नाहीत.
परिणामी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यांतील ऊसउत्पादक शेतकी अडचणीत आले. त्यांच्या कौटुंबिक विवंचना वाढल्या. तरीही काही ठोस उपायांची आखणी होत नसल्यामुळे भोसले यांनी शेतकऱ्यांच्या मनातील विश्वास गमाविला. भ्रामक कल्पनांमध्ये रमून समोर दिसणाऱ्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. स्वप्ने दाखविणे सोपे असते. पण स्वप्नांची पूर्ती करणे अवघड असते. खूप काही करण्याची स्वप्ने कारखान्यांच्या सभासदांना दाखवली. प्रत्यक्षात काहीच उतरत नव्हते. विशेषतः ऊसाचा मूळ धंदा अडचणीत आला. शेतकऱ्यांचे हाल होऊ लागले. जनसंपर्काच्या अभावामुळे वस्तुस्थिती लक्षात आली नाही.
ऐन निवडणुकीच्या काळात मदन भोसले यांच्या मदतीला कोरेगावचे आमदार महेश शिंदे धावले. पण त्यांच्या भाषणांचा रोख कारखान्यापेक्षा आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेचा राहिला. शेतकऱ्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नव्हते. त्यांचा रानात उभा असलेला ऊस त्यांचे काळीज जाळत होता. ही वेदना लक्षात न घेतल्यामुळेच भोसले- शिंदे यांचे मतदारांनी पानिपत केले. आता मात्र खरे आव्हान आहे ते पाटील बंधूंपुढे. प्रतापगड आणि खंडाळा कारखान्याचा प्रश्न सोडवून किसन वीर कारखान्याला उर्जितावस्था देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्यांना नियोजनबद्ध वाटचाल करावी लागणार आहे.