कात्रज – माझा रस्ता चुकतोय, असं काही नाही. ज्यावेळी तुमचा संघर्ष होत असतो, तुमच्या मागे कोणीतरी बोलतं, अडचणी येतात, तेव्हा तुम्ही असे समजयाचे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुम्ही त्यातले रस्ता बदलाल हे वाक्य घेता. पण, मी राज मार्गावर आहे आणि राहणार, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी मांडली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे याबाबत आंदोलन पुकारल्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे “नॉट रिचेबल’ होते. त्यावर साईनाथ बाबर यांनी कालच भूमिका मांडली. तर, वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज ते पत्रकारांसमोर आले. त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिरुपती बालाजी येथे मी गेली 17 ते 18 वर्ष कायम दर्शनाला जातो आहे. मी तिरुपतीचे बुकिंग करून ठेवले होते. तसेच, आंदोलना दरम्यान मनसेचे सर्व नेते माझ्या संपर्कात होते. त्यामुळे मी बालाजी दर्शनाचा कार्यक्रम रद्द केला नाही. कारण, याआधी ठाण्याच्या सभेला मला राज साहेबांनी बोलावल्यावर मी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचे लग्न होते. त्यावेळी सभेला गेलो नाही तर कार्यकर्त्यामध्ये गैरसमज निर्माण होतील, त्यामुळे घरातील लोकांची समजूत काढली आणि सभेला गेलो, असेही मोरे यांनी सांगितले.