आयटी कंपन्या सुरू झाल्याने सकाळ- संध्याकाळी वाहतूक कोंडी
रमेश ससार
हिंजवडी – अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहात बसलेल्या वरुण राजाने मंगळवारी (दि. 5) आयटी परिसरात जोरदार हजेरी लावली. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर दिवसभर सरीवर सरी येत असलेल्या या पावसाने आयटीनगरी हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतूक ठप्प झाल्याने सकाळ-संध्याकाळ येथील चक्का जाम होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.
वाहतूक विभागाचे ढिसाळ नियोजन, एकीकडे मेट्रोचे काम व मुख्य रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले. बुधवारी (दि. 6) रोजी सकाळी साडेआठपासून आयटीनगरी हिंजवडी आणि भूमकर चौक, विनोदेनगर, मधूबन हॉटेल्स, लक्ष्मी चौक या भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे तासन्तास येथील वाहने पावसात अडकून पडली होती. त्यामुळे आयटीयन्स, नोकरदार वर्ग, व्यावसायिक यांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले.
बुधवारी पहाटेपासून पावसाने या परिसरात जोर पकडला आहे. कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी होतेय वाहतूक कोंडी लक्ष्मी चौक, भूमकर वस्ती रस्ता भूमकर चौक, शिवाजी चौक, सुरतवाल कॉम्प्लेक्स वाकड रोड व आयटीचा मुख्य रस्त्यांवर सायंकाळच्या वेळेसही मोठी वाहतूक कोडी पाहायला मिळाली.
पावसाळ्यात वाहतूक नियोजन महत्त्वाचे आहे. महापालिका, पीएमआरडीए व एमआयडीसी प्रशासनाने अर्धवट कामे त्वरित पूर्ण करावीत व रखडलेले पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण करून हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तेव्हाच वाहतूक कोंडी दूर होईल.
– समीर बुचडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, हिंजवडी.