सर्व्हरला मिळेना कनेक्टिव्हिटी ः दस्तकारांचे अतोनात हाल
महाळुंगे इंगळे -खेड तालुक्यातील दस्त नोंदणीसाठी चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हरला कनेक्टिव्हिटीच मिळत नसल्याने संगणकीकृत दस्त नोंदणीची कामे ठप्प झाली आहेत. मागील आठवडाभरापासून दिवस दिवसभर नागरिक दस्त नोंदणीसाठी थांबून सायंकाळी हात हलवत पुन्हा माघारी फिरत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी सर्व्हरमधील बिघाड आणि बीएसएनएलकडे हात दाखवून मोकळे होत असल्याने दस्तकार अक्षरशः बेजार झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून येथील सर्व्हरला कनेक्टिव्हिटी न मिळाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बीएसएनएल लाइन नादुरुस्त असल्याने ही अडचण येत आहे. चाकण शहरासह तालुका पातळीवरील या प्रक्रियेत असेच अडथळे येत असल्याने दस्त नोंदणीस येणारे पक्षकार हैराण झाले आहेत. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे खेड तालुक्यात अनेकदा अधिकारी मंडळी दस्त नोंदणीची सर्व प्रणाली व्यवस्थित सुरू असताना देखील काही ठराविक दस्त नोंदणीसाठी सायंकाळी उशीर करून अवास्तव मागणी करीत असल्याच्याही तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
बीएसएनएलमधील बिघाड व अन्य कारणांमुळे वारंवार ‘डिस्कनेक्ट’ होणारा सर्व्हर प्रमुख अडचण ठरला आहे. त्याची कनेक्टिव्हीटी गायब होत असल्याने चाकणकरांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसभरात अचानक सर्व्हर सुरु झालाच तर एखादा दुसरा दस्त नोंदवून पुन्हा तांत्रिक दोष निर्माण होत आहेत. दिवसभरात दोन किंवा तीन या पलीकडे दस्त नोंदणी होत नसल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. सुट्टी काढून व दैनंदिन कामकाज सोडून दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना दिवसभर कार्यालयात थांबून रहावे लागते. इतके करूनही दस्त नोंदणी होईल, किंवा नाही याची शाश्वती नाही. बीएसएनएल मधील बिघाड व सर्व्हरच्या रडकथेमुळे बहुतेक कार्यालयांमध्ये कमी – अधिक प्रमाणात हीच अवस्था आहे.
नोंदणी प्रक्रियाच ठप्प झाल्याने गजबजणाऱ्या कार्यालय व परिसरात गेल्या चार दिवसांपासून यंत्रणा ठप्प असल्याने गोंधळ उडत आहे. बीएसएनएलमध्ये बिघाड होत असल्याने अशी अडचण येत असून, स्वतंत्र इंटरनेट जोडणी घेऊन यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
-ऍड. अतुल घुमटकर, चाकण
सर्व्हर आणि कनेक्टिव्हिटी सुरळीत सुरू राहिल्यास दिवसभर कामकाज चालते; मात्र त्यात बिघाड झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. बीएसएनएलची लाइन खराब झाल्यास अशी अडचण येत असून, याबाबत संबंधित बीएसएनएल अधिकारी आणि वरिष्ठांना सूचित करण्यात आले आहे.
-अनिता कणसे, दुय्यम निबंधक कार्यालय चाकण