नगरविकास मंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या गावातील जनभावना लक्षात घेऊन स्वतंत्र नगरपालिकेसाठी सरकार सकारात्मक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शिष्टमंडळाला दिली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणासाठी संघर्ष समिती आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. 27 गावातील नागरिकांना महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका हवी आहे तर काहींना ही गावे महापालिकेत समाविष्ट रहावी, असे वाटते. आपण भूमिपुत्रांच्या बाजूने असून शासन ग्रामस्थांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याप्रकरणी जलदगतीने सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि संघर्ष समिती व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.