ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन; “रयत सायन्स ऍण्ड इनोव्हेशन सेंटर’चे शरद पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन
सातारा – मानवी जीवनात आज तंत्रज्ञानाला पर्याय नाही. संरचनेचे सूक्षमत्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उलगडता येते. भारत हा तरुण संशोधकांचा देश बनवायचा असेल तर स्वदेशी तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. संशोधनाची आस विद्यार्थीदशेपासून असायला हवी तरच भारताची वाटचाल महासत्ता म्हणून होईल, असे प्रतिपादन मुंबईतील राजीव गांधी सायन्स सेंटरचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स व इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन व आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, प्रतिभा पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, अनिल मानेकर, शिवप्रसाद खेणद, डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. अरुण सप्रे, नितीन थोरात, डॉ वसंत शिंदे, सचिव प्राचार्य भाऊसाहेब कऱ्हाळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, रवींद्र पवार, कमलाकर महामुने, विजय सावंत प्रभाकर देशमुख, मुकेश शर्मा, प्राचार्य राजू मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. काकोडकर म्हणाले, रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. यामध्ये कर्मवीरांची दूरदृष्टी व प्रेरणा आहे. रयतने विज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे. शिक्षण हे काळाशी सुसंगत असावे. जागतिकीकरणाला सक्षमपणे सामोरे जायचे असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजायला हवी. विद्यार्थीदशेपासून विज्ञान प्रकल्प व संशोधनाची संधी मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची जिज्ञासापूर्ती झाली पाहिजे. मुलांच्या विकासासाठी पालकांनीही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. तंत्रज्ञान तयार करणारी मंडळी या भूमीतील आणि हे तंत्रज्ञान प्रादेशिकतेला अनुकुल असायला हवे.
जगात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ भारतात आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार व्हायला हवे. असे वातावरण देशात वैज्ञानिक क्रांती घडवू शकते. हवामान बदल व जागतिक स्रोतांच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. शरद पवार म्हणाले, नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी तयारी करणे हा संस्थेच्या सायन्स सेंटरचा हेतू आहे. कर्मवीरांच्या विचारांचा वारसा आप्पासाहेब पाटील यांनी पुढे नेला. त्यांनी कधीही व्यक्तिगत लाभाचा विचार केला नाही. तंत्रज्ञानाचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचा आहे.
सायन्स सेंटरचा विस्तार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करण्याचा विचार रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलने करावा. परदेश दौऱ्यात मी शैक्षणिक व संशोधन करणाऱ्या संस्थांना भेटी देत असतो. संशोधन व पेटंट ही आजच्या व्यवस्थेची गरज आहे.
शरद पवार यांच्या हस्ते शाळेचे नामकरण, आप्पासाहेब पाटील चरित्र ग्रंथ व अरविंद गुप्ता लिखित विज्ञान ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. आप्पासाहेबांच्या चरित्र ग्रंथाचे लेखक विजय नलावडे, कलाशिक्षक प्रताप जगताप, बांधकाम व्यावसायिक प्रवीण पात्रेकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. कऱ्हाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
बंदोबस्तावरील पोलिसांची दखल
राजकीय नेतेमंडळींची सुरक्षा व कार्यक्रमांच्या बंदोबस्तावेळी तासन्तास तिष्ठत राहणाऱ्या पोलिसांसाठी कशा पद्धतीने व्यवस्था करावी, याबाबत शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवले होते. पोलिसांची गरजेप्रमाणे किमान बसण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पवार यांनी पत्रात व्यक्त केली होती. गृहमंत्री देशमुख यांनी या पत्राची तातडीने दखल घेतल्याचे आज स्पष्ट झाले. या कार्यक्रमावेळी राजशिष्टाचार झाल्यानंतर पोलिसांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती.