पारनेर – तालुक्यातील सांगवी सूर्या येथील विठ्ठल मंदिरात पंचक्रोशीतील आठ ते दहा गावांच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या परिसरातील सांगवी सूर्या, जवळे , पठारवाडी, निघोज, वडुले, पिंपळनेर, पानोली, गांजीभोयरे या परिसरात प्रचंड गारपीट होऊन पिके नष्ट झाली होती.
या परिसरातील फळपिके, कांदा, भाजीपाला पिके, द्राक्ष व केळीबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या. गारपिटीनंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. राजकीय नेत्यांचे दौरे पार पडले परंतु कोणीही तातडीची नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली नाही. या गावांची चारा पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने शेजारील गावांतून जनावरांना चारा आणावा लागत आहे. शासनाने या ठिकाणी किमान दोन महिने चारा डेपो तातडीने सुरू करावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देणे, यावर्षीचे पीक कर्ज शासनाने भरण्याची हमी घेणे, अशा प्रमुख मागण्यांसह शेतकरी आक्रमक आहेत. जनावरांसोबत शेतकरी उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत. सध्या साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु, प्रशासनाकडून दखल घेतली नाही तर तीन दिवसांनंतर याच ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुका प्रशासनाकडून नायब तहसीलदार, तलाठी, पोलीस प्रशासनाने उपोषणकर्ते यांची भेट घेऊन तुमच्या तीव्र भावना शासनाकडे पोहचविणार असल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शासनाविरोधी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली.