Ajit Pawar – राजकीय पक्षामध्ये काम करत असताना किंवा कोणत्या सरकारमध्ये काम करत असताना कोणालाही नाराज ठेवून चालत नाही आणि सगळ्या घटकांना न्याय देता आला पाहिजे. कोणत्याही निर्णयाबात प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. मुंबईला गेल्यानंतर मी स्वत:, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांच्याशी बोलू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याचा अध्यादेश मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हातात सोपवला. त्यानंतर ओबीसींचे नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे जाहीर करत त्यांनी उघडपणे सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या घडामोडी सगळ्यांनी पाहिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत आरक्षण देणार असे सांगितले होते. मात्र त्याच्याशी प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. त्याबाबत आम्ही चर्चा करू. समज- गैरसमज होत असतात. काहीजण स्पष्टपणे बोलून दाखवतात. मात्र कोणाला दुखवायचे काही कारण नाही.
कोणावरही अन्याय करण्याचेही काही कारण नाही. कालच मुख्यमंत्री आणि माझे बोलणे झाले. मुंबईला गेल्यावर परत त्यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री, मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच भुजबळांशी बोलणार आहोत. त्यामुळे आम्हाला तोपर्यंत तर वेळ द्या असेही अजित पवार म्हणाले.