नवी दिल्ली – केंद्र सरकारने अपंग, जवान आणि वैज्ञानिक संशोधन संस्था यांच्यासाठीची अंदाजपत्रकातील तरतूद कमी करून त्यांच्यावर अन्याय केला आहे असा आरोप कॉंग्रेस नेते दीपेंद्रसिंह हुडा यांनी केला आहे. सरकार दावे मोठमोठे करीत असते पण प्रत्यक्षातील त्यांचा कारभार मात्र त्याच्या नेमका विपरीत असतो असे ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताचा जप करणाऱ्यांनी स्कील इंडिया योजनेची तरतूदही कमी केली आहे असे ते म्हणाले. या सरकारच्या काळात गेल्या 70 वर्षातील बेकारीचा सर्वाधिक दर नोंदवला गेला आहे. या सरकारच्या नितीमुळे देशाची संपत्ती काही मोजक्याच लोकांच्या हातात जात असून एक मोठा वर्ग संपत्तीपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत आहे. भारतातील 11 श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 13 लाख कोटी रूपयांची वाढ झाल्याचा विदारक अनुभव देशाने घेतला आहे असेही त्यांनी नमूद केले. यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला जादा निधी मंजुर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र सरकारने कृषी खात्याची तरतूद साडे आठ टक्क्यांनी कमी केली आहे असेही त्यांनी निदर्शनला आणून दिले.