नवी दिल्ली – सणासुदीचे दिवस आणि हिवाळा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना संसर्ग प्रतिबंधांबाबत केंद्र सरकारने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे या अभियानाची आज सुरुवात केली.
करोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेने एक व्हावे असे आवाहन मोदी यांनी ट्विटर संदेशात केले आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुणे, या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताचा कोविड 19 विरुद्धचा लढा लोकांनी सुरू केला असून करोना योद्ध्यामुळे या लढ्याला बळ मिळाले आहे, आपल्या संयुक्त प्रयत्नांमुळे अनेक जीव आपण वाचवू शकलो. आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्याला या लढ्याची तीव्रता कायम राखावी लागणार आहे, असेही पंतप्रधानांनी या संदेशात म्हटले आहे.
लोकांचा सहभाग मिळवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुणे, हे तीन मुख्य संदेश या मोहिमेअंतर्गत दिले जाणार आहेत. लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या जनआंदोलनासाठी संदेश दिला आहे.